जालना : राज्यातील सरकार पुन्हा माझे आंदोलन मोडण्याच्या प्रयत्नात असल्याचा गंभीर आरोप अंतरवाली सराटी गावात आंदोलन करत असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. सरकारकडून आता हा शेवटचा डाव टाकण्याची शक्यता असून, त्यांचा डाव मी यशस्वी होऊ देणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटले आहेत. तसेच, सरकारला 30 दिवसांचा वेळ दिला असून, त्यानंतर सभा घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. सोबतच या मेळाव्यासाठी लवकरच महाराष्ट्र दौरा करणार असल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज विचारमंथन बैठकीप्रसंगी शनिवारी आंतरवाली सराटी येथे बोलतांना म्हटले आहे. 'दिव्य मराठी'ने याबाबत वृत्त दिले आहे. 


छत्रपती संभाजीनगर येथे उपचार घेतल्यावर मनोज जरांगे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी गावात उपोषणा स्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, अंतरवाली सराटी येथे गोदाकाठावरील 142 गावातील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला. या नियोजन मेळाव्याला मोठया प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती. तर, यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे करीता शासनाला दिलेली मुदत 14 आक्टोंबर रोजी संपत आहे. या दिवशी शासनाच्या आदेशाची वाट पाहणे व पुढील नियोजन करण्यायासाठी राजस्तरीय सभेचे नियोजन करण्यात येत आहे. 


मराठा आरक्षणाकरीता अंतरवाली सराटी येथे आमरण व साखळी उपोषण होत आहे. शासनाने तीस दिवसाची मुदत मागतली ती मुदत देवून आमरण उपोषण थांबवले. आता साखळी उपोषण करण्यात येत आहे. शासनाला दिलेली मुदत 14 आक्टोंबर रोजी संपत आहे. त्यामुळे अंतरवाली सराटी परीसरात भव्य दिव्य सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. या करीता जागेची पाहणी करण्यात येत आहे. सोबतच यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे. 


पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापणार...


मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा तापतांना पाहायला मिळत आहे. तर आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांनी उपोषण केले होते. दरम्यान, याच उपोषणास्थळी पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. याचे पडसाद राज्यभरात उमटल्याचे पाहायला मिळाले. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी गावात जाऊन जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे यांनी सरकारला 30 दिवसांचा वेळ दिला. मात्र, 14 ऑक्टोबरला दिलेली मुदत संपत आहे. त्यानंतर जरांगे पुन्हा आमरण उपोषण सुरु करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maratha Reservation : जरांगेंच्या मागण्या काय होत्या? अन् कोणत्या मागण्या मान्य झाल्या?