Manoj Jarange Patil Protest: अंतरवाली सराटी (जालना): तब्बल सतरा दिवस मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फळांचा ज्यूस घेत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. 40 वर्षीय मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 2014 पासून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक आंदोलनं केली आहेत. पण, यापूर्वीच्या त्यांच्या आंदोलनाची फारशी चर्चा झालेली नव्हती. पण गेल्या 17 दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील केवळ राज्यातच नाही, तर संपूर्ण देशभरात चर्चेत आले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह जरांगे पाटलांच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी अख्खं मंत्रिमंडळ कामाला लागलं होतं. अखेर गिरीश महाजन, रावसाहेब दानवे यांची शिष्टाई अन् मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आलं. उपोषणाच्या सतराव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा ज्यूस घेत मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतलं. 


सतरा दिवसांपूर्वी मनोज जरांगेंनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला सुरुवात केली. समाजसेवक असलेले 41 वर्षीय मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले पण त्याबाबत फारसं कोणाला माहितीच नव्हतं. पण जालन्यात आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर मात्र हे उपोषण घराघरात पोहोचलं आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झटणारा नव्या चेहऱ्याची राज्यासह देशाला ओळख झाली, तो चेहरा म्हणजे, मनोज जरांगे पाटील. वय 41 वर्ष, राहणार शहगड अन् व्यवसायानं समाजसेवक असलेले मनोज जरांगे 20 वर्षांपासून वेगवेगळी आंदोलन केलीत. तसेच, आतापर्यंत ते 20 मराठा क्रांती मोर्चात सहभागी झाले आहेत. त्याचप्रमाणे मराठा क्रांती मोर्चाचा पहिला मोर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये निघाला होता, त्यामध्ये देखील जरांगे पाटलांचा महत्त्वाचा वाटा होता. 


मनोज जरांगे पाटील हे मूळचे महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील. उदरनिर्वाहासाठी ते अंबड, जालना येथे एका हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आले आणि तिथेच राहू लागले. सुरुवातीला ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, पण नंतर त्यांनी पक्षापासून फारकत घेतली आणि मराठा समाजाच्या सक्षमीकरणासाठी 'शिवबा ऑर्गनायझेशन' नावाची स्वतःची संघटना स्थापन केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचे खंबीर समर्थक असलेले मनोज जरांगे पाटील हे अनेकदा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध नेत्यांना भेटलेल्या शिष्टमंडळांचा भाग आहेत.


पाहा व्हिडीओ : Manoj Jarange यांनी CM Eknath Shinde यांच्या हातून ज्यूस पिऊन उपोषण मागे घेतलं | Maratha Reservation



मराठा आरक्षणासाठी अनेकदा जरांगे पाटलांचं उपोषण 



  • 2012 ला शहागडच्या उड्डाण पुलावर सात दिवसाच आमरण उपोषण केलं

  • 2013 ला शहागड ते मुंबई मराठा आरक्षणासाठी पायी दिंडी काढली

  • जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा दिवस उपोषण केलं 

  • अंबड तहसील कार्यालय समोर अकरा वेळा उपोषण केले.

  • छत्रपती संभाजी नगरला रेल्वे रोको आंदोलन केलं


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मोठी बातमी! अखेर 17 व्या दिवशी मनोज जरांगेंच उपोषण मागे; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन सोडलं उपोषण