गुंडेगाव (अहमदनगर): एखादी क्रांती घडवायची असेल तर प्रत्येक वेळी कुणीतरी नायकच पुढाकार घेईल असं होत नाही. 'स्वदेश' सिनेमातल्या शाहरुख खाननं जसं गावात पाणी आणलं तसा हिरो प्रत्येक गावात येणं शक्य नाही. त्यामुळे काही गोष्टी रावांना नाही, तर गावालाच कराव्या लागतात.



हाच आदर्श घेऊन नगरच्या गुंडेगावात गावकऱ्यांनी जलक्रांती घडवली. गावकऱ्यांनी एकत्र येऊन जलसंधारणासाठी वेगवेगळी कामं केली. त्यामुळे आज नदीत, नाल्यात, विहिरीत, तलावात, डबक्यात जिकडे बघावं तिकडे पाणीच पाणी. आज पाणीच पाणी शिवारात खेळत असल्यानं लोकांनी रब्बीचा हंगाम मारला आहे.

या जलक्रांतीनं गुंडेगावातली समस्या तर मिटलीच. पण आजूबाजूच्या 8 ते 10 गावांनाही त्याचा फायदा झाला आहे. गुंडेगावानं जलक्रांतीचा नवा पॅटर्न महाराष्ट्राला दिला आहे. सरकारनंही गुंडेगावचा सन्मान करत हे काम राज्याच्या गावागावात पोहोचवण्याचं काम केलं आहे.



गुंडेगावनं वृक्षलागवड, कुऱ्हाडबंदीसारखे उपक्रम राबवले. त्यामुळे राळेगण, हिवरेबाजार या गावांसोबत आता गुंडेगावचंही काम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतं आहे.