Continues below advertisement

जळगाव : काही महिन्यांपूर्वी पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण चांगलच चर्चेत होतं. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. आता, जळगावमधूनही (Jalgaon) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सुंदरमोती नगर येथे राहणाऱ्या मयुरी गौरव ठोसर (वय 23) या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी, 10 मे रोजी, बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील पडाळी येथील मयुरीचा विवाह गौरव ठोसरसोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच तिच्यावर सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला, तसेच पैशांची मागणीही केली जात होती, असा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

मयुरीचा वाढदिवस 9 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला होता. पण दुसऱ्याच दिवशी, 10 सप्टेंबर रोजी दुपारी घरात कुणी नसताना तिने गळफास घेऊन जीवन संपवले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर मयुरीचे वडील भगवान बुडूकले आणि कुटुंबीय 11 सप्टेंबरला जळगावात दाखल झाले. त्यांनी सासरच्या लोकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली असून, पती गौरव ठोसरसह सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, आरोपींच्या अटकेपर्यंत आपण मृतदेह स्वीकारणार नाही, असा ठाम पवित्रा मयुरीच्या नातेवाईकांनी घेतला होता. त्यामुळे, येथील जिल्हा रुग्णालयात काही काळ तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. रुग्णालयात मयुरीचे नातेवाईक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली.

Continues below advertisement

वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी संपवलं जीवन

सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या केल्यामुळे आरोपींना अटक न झाल्यास मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा मृत मयुरीच्या नातेवाईकांनी दिला आहे. लग्नाला अवघे चार महिने होताच मयुरी ठोसर हिने गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे मयुरीचा वाढदिवस झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सासरच्या लोकांकडून मानसिक, शारीरिक छळ आणि पैशांची मागणी केल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला. आरोपींना अटक न झाल्याने शवविच्छेदन करु न देण्याचा पवित्रा नातेवाईकांनी रुग्णालयात घेतल्याचं पाहायला मिळालं. तसेच, आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा निर्णयामुळे जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते.

हेही वाचा

सरकारी सेवा अन् योजनांचं काम व्हॉट्अपवरुन, आपलं सरकारचं दुसरं व्हर्जन येतय; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय