Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपने स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने करण पवार (Karan Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. जळगावात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु असतानाच स्मिता वाघ यांची बनावट पोस्ट एबीपी माझा'च्या नावाने व्हायरल होत आहे. 


निवडून आल्यास आपण मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना अटक करणार असल्याची स्मिता वाघ यांची बनावट पोस्ट सोशल मीडियावर 'एबीपी माझा'च्या नावाने व्हायरल होत आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून याबाबत स्मिता वाघ यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 


व्हायरल पोस्टबाबत स्मिता वाघ यांचे स्पष्टीकरण


स्मिता वाघ म्हणाल्या की, निवडणूक तोंडावर असताना पराभव समोर दिसू लागल्याने विरोधकांनी राजकारण किती खालच्या पातळीवर नेले आहे हे यातून दिसत आहे. मात्र यासंदर्भात आपण कायदेशीर कारवाई करणार आहे. मराठा महासंघाने मला पाठींबा जाहीर केला आहे. मराठा समाजाने पाठींबा दिला म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण विरोधक करत असतील तर जनता यांना कधीच माफ करणार नाही. 


जातीचा आधार घेऊन बदनामी करणे योग्य नाही


मी आजपर्यंत पर्यंत जरांगे पाटील साहेबांचे नावे देखील घेतले नाही. जरांगे पाटील यांची भूमिका योग्य आहे. त्यांच्या आंदोलनाला माझा विरोध असण्याचे काहीही कारण नाही. एबीपी माझाचे नाव वापरून जर कोणी अशा पद्धतीच्या पोस्ट व्हायरल करत असेल तर ते योग्य नाही. या लोकांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मला जनतेवर विश्वास आहे की, जनता अशा चुकीच्या पोस्टवर कधीही विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला बोलायचं तर विकासावर बोला मात्र जातीचा आधार घेऊन बदनामी करणार असाल तर ते योग्य नाही, असे स्मिता वाघ यांनी म्हटले आहे.


जनतेचा आम्हाला भरघोस प्रतिसाद


जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला का? अशी विचारणा केली असता स्मिता वाघ म्हणाल्या की, माझे तिकीट दीड महिन्याअगोदर निश्चित झाल्याने मला प्रचारासाठी भरपूर वेळ मिळाला आहे. मी फॉर्म भरल्यानंतर जनतेत जाऊन प्रचाराला सुरुवात केली. जनतेकडून आमचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


(दरम्यान, एबीपी माझा लोगो वापरून गेल्या काही दिवसांपासून फेक पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल केले जात आहे. या विरोधात एबीपी माझाने कायदेशीर कारवाईसाठी पाऊले उचलली आहेत.) 


आणखी वाचा


'जळगावात पराभवाच्या भीतीपोटी भाजपने डमी उमेदवार उभा केलाय', ठाकरेंच्या शिवसेनेचा गंभीर आरोप