Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) भाजपकडून (BJP) स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर शिवसेना ठाकरे गटाकडून (Shiv Sena UBT) करण पवार (Karan Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच शिवसेना ठाकरे गटाने भाजपवर गंभीर आरोप केला आहे.  


जळगावात (Jalgaon News) भाजपला पराभव दिसत असल्यामुळे भाजपने डमी उमेदवार उभा केला आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील मॅनेज केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत (Sanjay Sawant) यांनी केला आहे. संजय सावंत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर निशाणा साधला. 


संजय सावंत यांचा भाजपवर गंभीर आरोप 


संजय सावंत म्हणाले की, ठाकरेंच्या सेनेचे जळगाव लोकसभेचे उमेदवार करण पवार यांना हरविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवार आणि डमी उमेदवार करणसिंग संजयसिंग पवार (Karan Singh Sanjay Singh Pawar) हे भाजपची बी टीम आहे.  यासंदर्भात माझ्याकडे कागदोपत्री पुरावे देखील आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. 


असे कटकारस्थान करायची काय गरज ? 


भाजप जर पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याची घोषणा करत असेल तर त्यांना असे कटकारस्थान करायची काय गरज आहे. करण पवार नावाचा दुसरा उमेदवार त्यांना शोधायची गरज पडली. मात्र करण पवार शोधताना त्यांना करणसिंग संजयसिंग पवार नावाचा डमी उमेदवार (Dummy candidate) मिळाला आहे. मात्र राजकीय दबाव वापरून त्याचे नाव करण संजय पवार असे त्यांना घोषित करावे लागले. 


ही तर भाजपची बी टीम


जळगावमध्ये वंचितला उमेदवार सापडत नव्हता. हे दोन्ही उमेदवार 25 तारखेला पावणेतीनच्या दरम्यान अर्ज दाखल करायला गेले. दोघांची नोटरी सुद्धा 382 आणि 383 एमआरडी शर्मा नावाच्या एजंटने केली. या दोन्ही फॉर्मचे जे हस्ताक्षर आहेत. ते भाजपच्या कर्मचाऱ्यांच्या चाळीसगाव कार्यालयातील आहे. हे दोन्हीही उमेदवार हे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांचे सहकारी असल्याचा आरोप करत ही भाजपची बी टीम आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे (Shiv Sena UBT) मताधिक्य कमी करण्यासाठी हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप यावेळी संजय सावंत यांनी केला आहे. आता या आरोपांवर भाजपकडून काय उत्तर देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.