पुढच्या वेळी तरी 'संन्याशाला' भारतरत्न देण्यात यावा : बाबा रामदेव
एबीपी माझा वेब टीम | 27 Jan 2019 11:42 AM (IST)
स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला 'भारतरत्न' देण्यात आला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
गेल्या 70 वर्षात एकाही 'संन्याशाला' भारतरत्न देण्यात आला नाही याबद्दल योगगुरु बाबा रामदेव यांनी खंत व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यानंतर एकाही संन्याशाला देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न देण्यात आला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या 'भारतरत्न'ची घोषणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा 'भारतरत्न'ने सन्मान होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांनाही मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान होणार आहे. योगगुरु बाबा रामदेव यांनी मात्र भारतरत्नच्या यादीत एकाही संन्याशाचे नाव नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. महर्षी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंदजी किंवा शिवकुमार स्वामीजी यांच्यापैकी एकाला तरी पुढच्या वेळी भारतरत्न देण्यात यावा अशी रामदेव यांनी सरकारला विनंती केली आहे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींना भारतरत्न मिळाल्याबद्दल बाबा रामदेव यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच 'शिवकुमार स्वामी यांचे शिक्षण क्षेत्रात महत्वाचे योगदान असून त्यांना भारतरत्नने गौरविण्यात आले पाहिजे. शिवकुमार स्वामींना भारतरत्न न मिळणे दुर्दैवी आहे', असे रामदेव यांनी म्हटले आहे.