नवी दिल्ली : निवडणुका लढण्यासाठी काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे आता काँग्रेसकडून चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत. अशी टीका भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी केली आहे. काँग्रेसने नुकतेच प्रियांका गांधी यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. यावरुन भारतीय जनता पक्षाने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.


भाजप नेते कैलास विजयवर्गीय म्हणाले की, "काँग्रेसकडे चेहराच नाही त्यामुळे काँग्रेसकडून आता चॉकलेटी चेहरे समोर आणले जात आहेत. कधी सलमान खान काँग्रेसकडून निवडणूक लढणार असल्याची अफवा पसरवली जाते, तर कधी करीना कपूर निवडणुक लढणार असल्याच्या चर्चा रंगतात. तर कधी प्रियंका गांधीना राजकारणात आणले जाते."

नुकतीच माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांच्यावर पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर भाजप सातत्याने काँग्रेसला टार्गेट केले आहे. सुरुवातीला काँग्रेसवर घराणेशाहीवरुन टीका करण्यात आली. त्यानंतर आता थेट प्रियांका यांना लक्ष्य केले जात आहे.