नवी दिल्ली : जागतिक हवामान बदलाच्या संकटाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून इथेनॉलचा वापर 21 व्या शतकातील भारताची प्राथमिकता असेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी इथेनॉलच्या वापरासंबंधी संवाद साधला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पर्यावरण, वने आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'उत्तम पर्यावरणासाठी जैव इंधनाला प्रोत्साहन' ही या कार्यक्रमाची मुख्य कल्पना होती.


गेल्या सहा ते सात वर्षांमध्ये भारताची रिन्यूएबल एनर्जीची क्षमता ही 250 पटींहून अधिक झाल्याचं नरेंद्र मोदींनी सांगितलं. सध्या वापरात असलेल्या रिन्यूएबल एनर्जीच्या क्षमतेबाबत भारत जगातील पहिल्या पाच देशांच्या यादीत असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. गेल्या सहा वर्षाच्या काळात भारताच्या सौर उर्जेची क्षमता ही जवळपास 15 टक्क्यांनी वाढली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 


जागतिक हवामान बदलाच्या संकटाबद्दल भारत जागरुक असून त्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत सक्रियतेनं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 'One Sun, One World, One Grid' हे स्वप्न साकार करण्यासाठी इंटरनॅशनल सोलर असायन्स भक्कम व्हायला पाहिजे अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. 


इथेनॉलच्या वापरावर भारत लक्ष केंद्रीत करत असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "इथेनॉलवर लक्ष केंद्रीत केल्यानं त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे. 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित करायचा संकल्प आपण केला आहे. त्यासाठी एक रोडमॅप जाहीर करण्यात आला आहे."


 






देशभरात इथेनॉलच्या उत्पादनाशी आणि वितरणाशी संबंधित महत्वाकांक्षी E-100 पायलट प्रोजेक्टची सुरुवात पुण्यात करण्यात आली आहे. 


महत्वाच्या बातम्या :