नवी दिल्ली : दिल्लीवासियांपेक्षा मुंबईकर खूप जास्त काम करतात, मात्र त्यासाठी त्यांना कमी पगारात राबावं लागतं. त्यामुळे त्यांच्या जीवनमानावरही परिणाम होतो, असं निरीक्षण जागतिक बँकेच्या व्यवसाय सुलभता अहवालात नोंदवण्यात आलं आहे.


मुंबईकरांपेक्षा दिल्लीत काम करणाऱ्या लोकांना 60 टक्के अधिक वेतन मिळतं. दिल्लीतील सुपरमार्केटमध्ये काम करणाऱ्या व्यवस्थापकाला महिन्याला 14 हजार रुपये पगार मिळतो. त्याउलट मुंबईत तेच काम करण्याचा एक वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीला केवळ 8 हजार 650 रुपये मिळतात, असं अहवालात मांडलं आहे.

पगार जास्त मिळवायचा असल्यास दिल्लीकरांना सुट्ट्यांशी तडजोड करावी लागते. दिल्लीकर त्यासाठी कमी सुट्ट्यांमध्ये काम करतात, तर मुंबईतील कामगारांना तुलनेनं अधिक सुट्ट्या मिळतात. मुंबईत वर्षाला भरपगारी 21 सुट्ट्या मिळतात, तर दिल्लीत केवळ 15 सुट्ट्यांवर समाधान मानावं लागतं.

विशेष म्हणजे व्हिएतनाम, मेक्सिको सिटी, कुवैत यासारख्या विकसनशील शहरांच्या तुलनेत मुंबईत पगार आहे. दुसरीकडे, आपली राजधानी ही बँगकॉक, शांघाय, जकार्ता, क्वालालंपूर, मनिला यासारख्या शहरांपेक्षा महाग आहे. जागतिक बँकेचा हा सर्व्हे 190 देशातील सुपर मार्केटमधील 19 वर्षीय कॅशियर्सना किती पगार मिळतो याचा तुलनात्मक अभ्यास आहे.