गुरुग्राम : इमारतीला लागलेल्या आगीत अडकलेल्या रहिवाशांचे प्राण वाचवता-वाचवता 32 वर्षीय महिलेला जीव गमवावा लागला. गुरुग्राममध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री इमारतीला आग लागल्यानंतर स्वाती गर्ग यांनी प्रत्येकाचा दरवाजा ठोठावून त्यांना घराबाहेर काढलं होतं.


गुरुग्राममधील ट्युलिप ऑरेंज या टॉवरच्या पाचव्या मजल्यावर स्वाती गर्ग ही फॅशन डिझायनर महिला कुटुंबासह राहत होती. रविवारी मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास टॉवरच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रिक शाफ्टमध्ये आग लागली.  'टाइम्स ऑफ इंडिया'ने याविषयी वृत्त दिलं आहे.

आग लागल्याचं समजताच स्वाती यांनी पती गिरीश, चार वर्षांची मुलगी, आई आणि मैत्रिणीला घराबाहेर नेलं. आपल्या मजल्यावरील सर्वांनाही त्यांनी जागं केलं. आग खालच्या मजल्यांवर असल्याने स्वातीसह सर्वजण परत घरात शिरले आणि ओल्या टॉवेलसह वरच्या मजल्यावर गेले. स्वाती यांनी जवळपास प्रत्येकाचा दरवाजा ठोठावून रहिवाशांना बाहेर बोलावलं.

जीव वाचवण्यासाठी सर्वांनी टेरेसवर जाण्याचा निर्णय घेतला. स्वाती पुढाकार घेत दहाव्या मजल्याच्या टेरेसपर्यंत पोहचल्या, मात्र त्यांना दरवाजा लॉक दिसला. परतीच्या मार्गात धुराचं साम्राज्य असल्यामुळे त्या तिथेच अडकल्या.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आग आटोक्यात आणून सर्व रहिवाशांची सुटका केली, तर दोन तासांनी टेरेसच्या दरवाजाजवळ त्यांना स्वाती निपचित पडलेल्या आढळल्या. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच स्वाती यांना मृत घोषित करण्यात आलं. धुरात गुदमरुन स्वाती गर्ग यांना प्राण गमवावे लागले, असा अंदाज आहे.

हरियाणात अग्निशमन केंद्रांची कमतरता असल्यामुळे जवळचं केंद्र 12 किलोमीटर दूर आहे. रात्री 2.28 वाजता आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला येईपर्यंत 45 मिनिटांचा वेळ गेला.

स्वाती गर्ग यांनी इमारतीतील जवळपास प्रत्येक रहिवाशाची सुटका केली, मात्र इतरांचा जीव वाचवताना त्यांना स्वतःच्या प्राणाची आहुती द्यावी लागल्याने सर्वत्र दुःख व्यक्त केलं जात आहे.