अशोकनगर : मध्य प्रदेशच्या अशोकनगरमध्ये एका महिलेला गाठ झोपेमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कारण, चालत्या ट्रेनच्या टॉयलेटचा दरवाजा उघडण्याऐवजी, मुख्य दरवाजा उघडल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आहे.


अधिक माहितीनुसार, जोधपूर-भोपाल एक्स्प्रेसने राजकुमारी शर्मा आणि त्यांचे पती राजेंद्र शर्मा प्रवास करत होते. भोपाळमधील आपल्या मुलाच्या नव्या फ्लॅटची वास्तूशांत अटोपून हे दाम्पत्य परतीचा प्रवास करत होते. दिवसभरच्या धावपळीमुळे दोघेही थकून गेले होते, त्यामुळे ट्रेनमध्ये लवकर झोपी गेले.

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास राजकुमारी टॉयलेटकडे जाण्यासाठी उठल्या. पण त्यावेळी त्यांच्या डोळ्यावर झोप तशीच होती. टॉयलेटजवळ असल्याचे समजून त्यांनी ट्रेनचा मुख्य दरवाजा उघडला, आणि एक पाय पुढे टाकला. पण काही कळायच्या आत त्यांचा तोल गेल्याने त्या धावत्या ट्रेनमधून खाली पडल्या.

ही बाब राजकुमारी यांचे पती राजेंद्र यांच्या लक्षात येताच, त्यांनी ट्रेनची चेन खेचून ट्रेन थांबवली. यानंतर ट्रेनच्या लोकोपायलटला सर्व माहिती सांगितली. लोकोपायलटने डीआरएमशी संपर्क साधल्यानंतर ती ट्रेन जवळपास एक किलोमीटर ट्रेन मागे नेली.

ट्रेन जिथे थांबवण्यात आली, त्या ठिकाणी राजकुमारी गंभीर जखमी अवस्थेत पडल्या होत्या. त्यांना तात्काळ रुग्णालायत दाखल करण्यात आलं. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.