कोळीकोड : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केरळच्या कोळीकोडमध्ये पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याचं सुतोवाच केलं. कोळीकोडमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील शेवटच्या दिवशी अमित शाहनी नेत्यांशी संवाद साधला.


"काश्मीर हे भारताचे अविभाज्य अंग आहे, जगातील कोणतीही शक्ती काश्मीरला भारतापासून तोडू शकत नाही," अमित शाह यांनी कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केलं.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या भाषणातून दहशतवादाचं समर्थन

"पाकिस्तान आज राष्ट्रीय पातळीवर दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारत बऱ्याच काळापासून पाकिस्तानच्या दहशतवादाला बळी पडलेला आहे. गेल्या दीड दशकात आम्ही अनेक छोटे-मोठे दहशतवादी हल्ले झेलले आहेत. नुकताच काश्मीरमधील उरीमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावण्यासाठी पाकिस्तान नेहमीच खतपाणी घालत आला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचं संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणावरुन ते दहशतवादाचं समर्थन करत असल्याचं सिद्ध होत आहे," असं अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले.

 

उरी हल्ल्याला चोख प्रत्यूत्तर दिलं जाईल

अमित शाहंनी कार्यकारिणीच्या बैठकीत केलेल्या भाषणात उरीतील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार असल्याचंही सांगितलं. तसंच उरीतील शहीद जवानांना श्रद्धांजलीही अर्पण केली.

संविधान न मानणाऱ्यांशी चर्चा होणार नाही

काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग आहे. भारत नेहमीच शांततेच्या मार्गावर चालण्यास तयार आहे. पण आता चर्चा फक्त भारताच्या संविधानाचा आदर करणाऱ्यांसोबतच होईल, असंही शाह म्हणाले.

संबंधित बातम्या :

दहशतवाद्यांनो, उरी हल्ला आम्ही कधीही विसरणार नाही : मोदी

उरी हल्ल्याचा सूड घेणारच, 'मन की बात'मधून मोदींचा...

पाकचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी सुषमा स्वराज...

ABP EXCLUSIVE : नवाज शरीफ यांचं UN मधील भाषण लीक