बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी आज ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात नवीन पटनायक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत.


ओदिशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला 147 पैकी 112 जागा मिळाल्या आहेत. या विजयाचं सर्व श्रेय नवीन पटनायक यांना दिलं जात आहे. देशभरात मोदी लाट असतानाही ओदिशामधील जनतेनं मात्र पटनायक यांच्या बाजून कौल दिला आहे.

नवीन पटनायक यांचे वडील बिजू पटनायक हे देखील ओदिशाचे मुख्यमंत्री होते. बिजू पटनायक स्वातंत्र्यसैनिक तर होतेच शिवाय त्यांनी पायलट म्हणुनही मोठी कामगिरी केली होती. दुसऱ्या महायुद्धात तसेच 1947 मध्ये पाकिस्तानने काश्मिरवर हल्ला केला त्यावेळी बिजू पटनायक यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. परंतू वडील जिवंत असेपर्यंत नवीन पटनायक राजकारणापासून दुर होते. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द डिसीवर्स' या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिका देखील साकारली होती.

बिजू पटनायक यांच्या निधनानंतर 1997 मध्ये नवीन सक्रिय राजकारणात आले. आपल्या वडिलांच्या नावावरुन त्यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली. सुरुवातीला नवीन पटनायक ओदिशातील अस्का मतदारसंघातून लोकसभेवर निवडुन गेले. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रात मत्रीपदही देण्यात आलं होते. 2000 साली ओदिशामधील विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाने भाजपसोबत युती करत बहुमत मिळविले. तेव्हा नवीन पटनायक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

तेव्हापासून गेली 19 वर्षे नवीन पटनायक ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. 2009 साली भाजपची सोथ सोडल्यानंतर पटनायक यांनी तिसऱ्या आघाडीशी हात मिळवणी केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवलेल्या त्यांच्या पक्षाला 103 जागा मिळाल्या होत्या.

नवीन पटनायक यांनी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा बराच काळ ओदिशाच्या बाहेर काढल्याने तेथील ओडिया भाषेवर त्यांचं प्रभुत्त्व नाही. ते राज्यातील प्रमुख भाषा बोलता न येणार एकमेव मुख्यमंत्री आहेत. सुरुवातीच्या काळात प्रचारसभेतील त्यांची भाषणं 'रोमन' मध्ये लिहीली जात असत. पटनायक ती भाषणं वाचुन दाखवत. या गोष्टीमुळे त्यांच्यावर बरीच टिकीही झाली.

नवीन पटनायक यांनी राज्यातील जनतेला लोकांना खुश ठेवण्यासाठी अनेक योजना चालवल्या आहेत. 'एक रुपयात तांदुळ, मोफत सायकल, पाच रुपयात जेवण अशा अनेक योजनांमुळे त्यांच्या पक्षाची लोकप्रियता वाढली. गरिबी निर्मुलनासाठीही पटनायक यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच ओदिशामध्ये सलग पाचव्यांदा बिजू जनता दलाचे सरकार स्थापन झाले आहे.

भारतातील सर्वात शांत राजकारणी म्हणुन देखील नवीन पटनायक ओळखले जातात. अतिशय मितभाषी असलेले पटनायक सिक्किमचे मुख्यमंत्री पवन सिंह चामलिंग यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्ड तोडण्याच्या वाटेवर आहेत. पवन सिंह चामलिंग सलग 24 वर्षे सिक्किमचे मुख्यमंत्री होते.