नवी दिल्ली : "बिनशर्त माफी मागितल्याशिवाय शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमान प्रवासबंदी उठवणार नाही," अशी भूमिका एअर इंडियाने घेतली आहे.


एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनेक विमान कंपन्यांनी रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. त्यानंतर आज खासदार गायकवाड यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी एअर इंडियाच्या कर्मचारी संघटनेने केली आहे.

एअर इंडियाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक अश्वनी लोहानी यांना लिहिलेल्या पत्रात कर्मचारी संघटनेने म्हटलं आहे की, "नागरी उड्डाण मंत्रालय किंवा संसदेने रवींद्र गायकवाड यांच्यावरील बंदी उठवली तर कर्मचाऱ्यांच्या आत्मसन्मानावर परिणाम होईल. गायकवाड विमानाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सरकारने यावर गांभीर्याने विचार करावा."

दरम्यान, एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांचं 17 एप्रिलचं दिल्ली-मुंबई आणि 24 एप्रिलचं मुंबई-दिल्ली तिकीट रद्द केलं आहे.

काय आहे प्रकरण?

उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड हे पुण्याहून दिल्लीला जात होते. बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला. रवींद्र गायकवाड त्याची तक्रार दिल्लीत गेल्यावर करणार होते. दिल्लीत विमान पोहोचल्यानंतर त्यांनी तक्रार पुस्तिका मागवली, पण एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी त्यासाठी नकार दिला, असा दावा गायकवाड यांनी केला.

विमानातून सर्व कर्मचारी उतरुन गेल्यानंतरही रवींद्र गायकवाड बसून राहिले. तक्रार करण्याचा त्यांचा हट्ट होता. त्यानतंर क्रू मेंबरने एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला बोलावलं. मात्र त्या कर्मचाऱ्याने अरेरावीची भाषा केली, असं रवींद्र गायकवाड यांचं म्हणणं आहे.

‘मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही,  मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो,  अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि 25 सँडल मारले’’, अशी कबुली रवींद्र गायकवाड यांनी दिली.

भारतीय विमान संघाची बंदी

भारतीय विमान संघानं गायकवाडांवर बंदी घातली आहे. जवळपास भारतातील सर्व विमान कंपन्यांनी गायकवाडांवर बंदी घातली आहे. भारतीय विमान संघामध्ये गोएअर, जेट एअरवेज, जेटलाईट, इंडिगो यासारख्या प्रमुख विमान कंपन्यांचा समावेश आहे.

कोण आहेत रवींद्र गायकवाड?

– रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार आहेत

– लोकसभा निवडणुकीत रवींद्र गायकवाड यांनी राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांचा पराभव केला.

– उस्मानाबाद आणि परिसरात रवी सर म्हणून ते परिचित आहेत

– रवींद्र गायकवाड हे उमरगा मतदारसंघातून दोन वेळ विधानसभेवर निवडून गेले होते.

– दुष्काळी भागात पाझर तलावासाठी त्यांनी काम केलं आहे.

संबंधित बातम्या

खा. रवींद्र गायकवाडांवरील विमानबंदी मागे घेण्याची शक्यता: सूत्र

'सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही', हवाईमंत्र्यांनी गायकवाडांना ठणकावलं!

मी मारलं नाही, त्या अधिकाऱ्याला फक्त ढकललं: रवींद्र गायकवाड

सरकारच्या एकतर्फी निर्णयाची लाज वाटते : खा. अनंत गीते

अखेर शिवसेना खा. रवींद्र गायकवाड संसदेत दाखल