नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिरासंबंधी एक मोठं विधान केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाला जर निर्णय घेता येत नसेल तर उत्तरप्रदेश सरकार 24 तासांच्या आत राम मंदिराचा प्रश्न निकाली काढेल, असं विधान योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. नवी दिल्लीमध्ये एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी राम मंदिराबाबत हे विधान केलं आहे.


"राम मंदिराबाबात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते ते पाहू आणि त्यानंतर राममंदिराबाबत निर्णय घेऊ," अशी भूमिका याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केली आहे. दरम्यान 29 जानेवारीला सुप्रीम कोर्टात राम मंदिरासंबंधी सुनावणी होणार आहे.

"अयोध्या प्रकरणी न्यायालयाने त्वरित निकाल द्यावा," असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आदित्यनाथ म्हणाले की, "निकाल देण्यासाठी उशीर झाल्यास लोकांचा शासकीय संस्थांवरील विश्वास उडेल. न्यायालयाला लवकर निकाल देणं जमत नसेल, तर त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं, आम्ही अवघ्या 24 तासांमध्ये राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावू."

दरवेळीप्रमाणे यावर्षीदेखील निवडणुकांपूर्वी राम मंदिराच्या प्रश्नाने देशातले वातावरण तापले आहे. राम मंदिर प्रश्नी 29 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. यावेळी सुप्रीम कोर्ट काय फैसला देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राम मंदिर व्हायलाच हवे, अशी मागणी देशभरातील, प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील साधू संतांकडूनही होत आहे. देशभरातील अनेक हिंदुत्त्ववादी संघटना आणि पक्ष राम मंदिरावरुन आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्या दौरा केला. तेव्हा त्यांनी 'पहले मंदिर फिर सरकार', अशी घोषणा केली. तसेच शिवसेनेसह अनेक हिंदुत्त्ववादी संघटनांनी राम मंदिरप्रश्नी अध्यादेश काढावा अशी मागाणी केली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार ते पाहुया. त्यानंतर काय करायचे ते ठरवू अशी भूमिका घेतली आहे.