अलाहाबाद : 2014 लोकसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व जागा जिंकत संपूर्ण उत्तरप्रदेश काबीज केलेल्या भाजपाला, पोटनिवडणुकीत मात्र मोठा झटका बसला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमध्येच भाजप उमेदवाराला पराभवाची चव चाखावी लागली आहे. ‘अतिआत्मविश्वासामुळे पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला.’ अशी कबुली मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली.


अति आत्मविश्वास नडला : योगी आदित्यनाथ

'या पोटनिवडणुकीत कुठे कमतरता राहिली याची आम्ही समीक्षा करु. हा जनतेचा निर्णय आहे आणि लोकशाहीमध्ये जनता जनार्दन असते. ही जनतेचा कौल मान्य करतो. तसंच विजयी उमेदवारांना शुभेच्छाही देतो.' असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

'शेवटच्या क्षणी सपा आणि बसपा यांनी युती केली. जेव्हा उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली त्यावेळी सर्व पक्ष वेगवेगळे लढत होते. पण त्याचवेळी राज्यसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि दोन्ही पक्षांनी युती केली. भाजपचा पराभव हा आमच्यासाठी समीक्षेचा विषय आहे. भविष्यात चांगली कामगिरी करता यावी यासाठी आम्ही आतापासूनच योजना तयार करणार आहोत. आम्हाला माहिती आहे की, उत्तरप्रदेशमध्ये फायद्यासाठी काही जण युती करतील. पण आता जनता ते मान्य करणार नाही. पण या पोटनिवडणुकीत आम्हाला अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे या पोटनिवडणुकीतील पराभवाची आम्ही समीक्षा करु.' असंही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

उत्तरप्रदेश-बिहार पोटनिवडणुकीत भाजपचा मोठा पराभव

दरम्यान, भाजपचे उमेदवार उपेंद्र दत्त शुक्ल यांचा सपा उमेदवार प्रविणकुमार निषाद यांनी मोठ्या फरकाने पराभव केला आहे. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या फुलपूरमध्येही समाजवादी पक्षाचे उमेदवार नागेंद्र पटेल यांनी भाजप उमेदवार कौशलेंद्र पटेल यांना पराभवाची धूळ चारली.

जवळपास 60 हजाराच्या मताधिक्क्याने सपा-बसपा आघाडीचे नागेंद्र पटेल विजयी झाले आहेत. दुसरीकडे बिहारच्या अररियामध्येही भाजप-जेडीयू आघाडीचे उमेदवार प्रदीप सिंह यांचा आरजेडी उमेदवार सर्फराज आलमने पराभव केला आहे. उत्तरप्रदेशातील भाजप उमेदवारांचा पराभव म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा झटका मानला जात आहे.

गोरखपूरमध्ये आदित्यनाथ यांना धक्का
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या गोरखपूर मतदारसंघात 11 मार्च रोजी मतदान झालं होतं. इथे सुमारे 47 टक्के मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला होता. या जागेसाठीची मुख्य लढत भाजप विरुद्ध सपा-बसपा युती यांच्यात आहे.

सलग पाच वर्ष खासदार म्हणून निवडून आलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघात, समाजवादी पक्षाचे उमेदवार प्रवीण निषाद यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. तर भाजप उमेदवार उपेंद्र शुक्ल हजारो मतांनी पिछाडीवर आहेत. या जागेवर भाजपला 28 वर्षांनंतर पराभवाचा सामना करावा लागू शकतो. 1991 पासून ही जागा भाजपच्या खात्यात आहे.

फूलपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना झटका

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर फूलपूर मतदारसंघात निवडणूक झाली. इथेही भाजपवर मोठ्या फरकाने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. या मतदारसंघात भाजपचे कौशलेंद्र पटेल आणि सपाचे नागेंद्र पटेल यांच्यात सामना रंगला.

सपा-बसपाची युती

बसपाने गोरखपूर आणि फूलपूर या दोन्ही जागांवर आपले उमेदवार दिलेले नाहीत. बसपाने सपाच्या उमेदवारांना समर्थन दिलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कामाची पोचपावती समजल्या जाणाऱ्या ह्या पोटनिवडणुकीतील झटक्यामुळे भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधक सज्ज?

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा हा मोठा पराभव असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे, 2014मध्ये दोन्ही जागांवर सपा आणि बसपाला जेवढी मतं मिळाली होती, त्यापेक्षा भाजपला जास्त मतं होती. ते अंतर संपवून पुन्हा मोठा विजय मिळवणं, म्हणजे सपा-बसपाच्या भविष्यातील आघाडीच्या शक्यतेला आणखी मजबुती मिळते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने सपा आणि बसपासोबत युती केली नव्हती. त्यामुळे जर 2019 मध्ये काँग्रेसही महायुतीमध्ये सहभागी झाली तर भाजपला कडवी टक्कर देण्याच्या स्थितीत विरोधक असतील.

संबंधित बातम्या :

LIVE : फूलपूरमध्ये कमळ कोमेजलं, सपाचा मोठा विजय