लखनौ : भाजपला उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीत धक्का बसला आहे. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जाणाऱ्या गोरखपूर मतदारसंघात समाजवादी पक्षाने जोरदार मुसंडी मारत भाजपच्या उमेदवाराचा धुव्वा उडवला. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचे वर्चस्व असलेल्या फूलपूर मतदारसंघातही भाजपच्या उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला.


सपाला या पोटनिवडणुकीत मायावती यांच्या बसपाचा पाठिंबा होता. भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक वर्षांची राजकीय कटुता विसरून सपा-बसपा एकत्र आले होते. या आघाडीमुळेच भाजपचे सगळे डावपेच निष्फळ ठरले. योगी आदित्यनाथ यांनीही पोटनिवडणुकीचं चित्र स्पष्ट झाल्यावर सपा-बसपाच्या मैत्रीवर निशाणा साधला.

फूलपूर मतदारसंघात सपाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. सपाचे उमेदवार नागेंद्र पटेल यांनी 59 हजार 613 मतांनी भाजपचे उमेदवार कौशलेंद्र पटेल यांचा पराभव केला. नागेंद्र यांना 3 लाख 42 हजार 796, तर कौशलेंद्र यांना 2 लाख 83 हजार 183 मतं मिळाली.

गोरखपूरमध्ये सपाचे उमेदवार प्रवीणकुमार निषाद यांनी 4 लाख 56 हजार 513 मतं मिळवत 29 वर्षांनंतर भाजपचा गड उद्ध्वस्त केला. भाजपचे उमेदवार उपेंद्र शुक्ल यांना 4 लाख 34 हजार 652 मतं मिळाली. योगी आदित्यनाथ यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

दरम्यान, या निकालानंतर सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मायावतींची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. राज्यसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या निकालांनी उत्तर प्रदेशातील राजकारणाची समीकरणं बदलली आहेत. कारण, सर्वात जास्त लोकसभा मतदारसंघ असणारं उत्तर प्रदेश हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे भाजपला 2019 च्या निवडणुकीपूर्वी हा धक्का आहे.

गोरखपूरमध्ये आदित्यनाथ यांना धक्का

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या गोरखपूर मतदारसंघात 11 मार्च रोजी मतदान झालं होतं. इथे सुमारे 47 टक्के मतदारांनी आपल्या अधिकाराचा वापर केला होता. या जागेसाठीची मुख्य लढत भाजप विरुद्ध सपा-बसपा युती यांच्यात होती. या मतदारसंघात योगी आदित्यनाथ सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

फूलपूरमध्ये उपमुख्यमंत्र्यांना झटका

उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यानंतर फूलपूर मतदारसंघात निवडणूक झाली. इथेही भाजपवर मोठ्या फरकाने पराभवाची नामुष्की ओढावली. या मतदारसंघात भाजपचे कौशलेंद्र पटेल आणि सपाचे नागेंद्र पटेल यांच्यात सामना रंगला.

सपा-बसपाची युती

बसपाने गोरखपूर आणि फूलपूर या दोन्ही जागांवर आपले उमेदवार दिले नव्हते. बसपाने सपाच्या उमेदवारांना समर्थन दिलं होतं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कामाची पोचपावती समजल्या जाणाऱ्या ह्या पोटनिवडणुकीतील झटक्यामुळे भाजप सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

बिहारमध्येही भाजपच्या पदरी निराशाच

बिहारमधील अररिया लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे सरफराज आलम यांनी भाजपचे उमेदवार प्रदीपकुमार सिंह यांचा 61 हजार 988 एवढ्या मोठ्या फरकाने पराभव केला. जहानाबाद विधानसभा मतदारसंघातही राजदचा विजय झाला. राजदचे कुमार कृष्ण मोहन यांनी जेडीयूचे अभिराम वर्मा यांना पराभवाची धूळ चारली. भभुआ विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपने वर्चस्व कायम राखलं. या मतदारसंघात भाजपच्या रिंकी राणी पांडे यांनी काँग्रेसचे शंभूसिंह पटेल यांचा पराभव केला.

भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधक सज्ज?

2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपचा हा मोठा पराभव असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे, 2014मध्ये दोन्ही जागांवर सपा आणि बसपाला जेवढी मतं मिळाली होती, त्यापेक्षा भाजपला जास्त मतं होती. ते अंतर संपवून पुन्हा मोठा विजय मिळवणं, म्हणजे सपा-बसपाच्या भविष्यातील आघाडीच्या शक्यतेला आणखी मजबुती मिळते. या पोटनिवडणुकीत काँग्रेसने सपा आणि बसपासोबत युती केली नव्हती. त्यामुळे जर 2019 मध्ये काँग्रेसही महायुतीमध्ये सहभागी झाली तर भाजपला कडवी टक्कर देण्याच्या स्थितीत विरोधक असतील.