पणजी : केरये-खांडेपार येथे जलवाहिनी फुटल्याने गुरुवारी सकाळपासून संपूर्ण तिसवाडी तालुक्यातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. पाण्याविना लोकांचे प्रचंड हाल सुरु आहेत. राजधानी पणजीतही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.


रविवारपर्यंत पाणीपुरवठा होणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लोकांना आज आणि उद्यादेखील त्रास सहन करावा लागणार आहे.

राजधानी पणजीमध्ये 600 हून अधिक लोकांनी टँकरची मागणी केली आहे. तितक्या प्रमाणात टँकर उपलब्ध नसल्याने अनेकजण घर सोडून दूसरीकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

पहिल्यांदाच एवढे दिवस पाण्याविना काढण्याची वेळ तिसवाडीतील लोकांवर आली आहे. तिसवाडी आणि फोंडा तालुक्यालाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे गुरुवारी सकाळी संरक्षक भिंत कोसळल्याने जलवाहिनी फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला आहे.

सहा मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळल्याने त्यातून जाणारी जलवाहिनी फुटली आहे. सध्या संरक्षक भिंत उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून त्याला शनिवारपर्यंतचा वेळ लागणार आहे. परंतु तरिही रविवारपर्यत पाणीपुरवठा होणे शक्य नाही. सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होईल. ओपा पाणी प्रकल्पाच्या इतिहासात एवढी मोठी घटना पहिल्यांदाच घडली आहे, असेही मंत्री दीपक पाऊसकर यांनी सांगितले.

तिसवाडी, माशेल, कुंभारजुवे, ओल्ड गोवा, खोर्ली, करमळी, रायबंदर, सांतआंद्रे या भागातला पाणीपुरवठा गुरुवारपासून बंद आहे. महत्त्वाचे म्हणजे बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजलाही पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे गोमेकॉमधील रुग्णांचे हाल होत आहेत. बाहेरून बाटल्या भरून पाणी आणण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाईकांवर आली आहे.

अचानकपणे तिसवाडी तालुक्याचा पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांमध्ये हाहाःकार माजला. मिळेल तिथून पाणी आणण्यासाठी लोकांची भांडी घेऊन धावपळ सुरु आहे. पडलेल्या संरक्षक भिंतीची माती हटवण्याचे काम सुरु आहे.. काँक्रीटीकरण करुन संरक्षक भिंत उभारण्यास शनिवारपर्यंतचा वेळ लागणार आहे. त्यानंतर नवीन जलवाहिनी बसवण्याचे काम सुरु होणार आहे. रविवारपर्यंत हे काम सुरु रहाणार आहे. त्यामुळे सोमवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे.