नवी दिल्ली : देशाचा नवा उपराष्ट्रपती आज निवडला जाणार आहे. एनडीएकडून व्यंकय्या नायडू तर यूपीएकडून महात्मा गांधींचे नातू गोपाळकृष्ण गांधी अशी ही लढत आहे.


संसदेच्या प्रांगणात आज दोन्ही सदनातले खासदार मतदान करतील. सकाळी 10 ते 5 अशी मतदानाची वेळ आहे. मतमोजणी लगेचच संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल. त्यामुळे आजच निकालाचं चित्रही स्पष्ट होईल.

कोणाचं संख्याबळ किती?

संख्याबळ लक्षात घेतलं तर एनडीएचे व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्चित आहे. दोन्ही सभागृहातले मिळून 790 खासदार आहेत. मात्र सध्या लोकसभेच्या दोन तर राज्यसभेची एक जागा रिक्त आहे. शिवाय भाजपचे लोकसभा खासदार छेदी पासवान यांना एका न्यायालयाच्या निकालामुळे मतदान करता येणार नाही.

लोकसभेच्या 545 जागांपैकी भाजपकडे 281 तर एनडीएकडे 338 इतकं संख्याबळ आहे. राज्यसभेतही भाजप 58 जागांसह सगळ्यात मोठा पक्ष बनलाय. एनडीएत नसलेले तेलंगणा राष्ट्र समिती, एआयडीएमके, वायएसआर काँग्रेस हे तीन पक्ष राष्ट्रपती निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत एनडीएलाच मतदान करणार आहेत.

नितीश कुमार यांचा गोपाळकृष्ण गांधींना पाठिंबा

नितीशकुमार यांनी गोपाळकृष्ण गांधींना दिलेलं वचन पाळायचं ठरवलंय. कारण सध्या ते भाजपसोबत असले तरी उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांनी आधीच गांधींच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं.

नितीशकुमार यांच्याप्रमाणेच राष्ट्रपतीपदाला कोविंद यांना पाठिंबा देणारा बिजू जनता दल यावेळी यूपीएच्या गोटात असणार आहे. पण तरीही दोन्ही सभागृहातलं संख्याबळ पाहता नायडूंचा विजय निश्चित मानला जात आहे.