पाटणा : बिहारमध्ये जेडीयूने महायुतीमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर, आणखी एक राजकीय भूकंपाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण जेडीयूचे वरिष्ठ नेते शरद यादव वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहेत. याबाबतचे संकेत जेडीयूचे माजी आमदार आणि शरद यादव यांचे निकटवर्तीय विजय वर्मा यांनी दिले आहेत.


एबीपी न्यूजशी बोलताना वर्मा यांनी शरद यादव महायुतीमध्ये राहण्यासाठी, जेडीयूतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना करु शकतात, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

विजय वर्मा म्हणाले की, ''सध्या शरद यादव जुन्या सहकाऱ्यांच्या संपर्कात असून, बिहारमधील राजकीय परिस्थितीवर त्यांच्याशी चर्चा करत आहेत. ते सध्या नव्या पक्षाची स्थापना करण्यासाठी चाचपणी करत आहेत.'' विशेष म्हणजे, शरद यादव यांचा धर्मनिरपेक्ष शक्तींच्या महायुतीमध्ये राहण्याकडे जास्त कल असल्याचा दावाही वर्मा यांनी केला आहे.

वर्मांनी पुढे सांगितलं की, ''शरद यादव यांनी यासाठी काँग्रेस नेते गुलाम नबी अझाद आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरींची भेट घेतली आहे. शिवाय, एनडीए सरकारमध्ये सहभागी होऊन, मंत्रीपदाची शपथ घेण्यास स्पष्ट नकार दिल्याचीही माहिती वर्मा यांनी दिली.

पण शरद यादव कुणाच्या संपर्कात आहेत, याबाबत विचारले असता, यावर अधिक खुलासा करण्याचं वर्मा यांनी टाळलं.

दरम्यान, जेडीयूचे सरचिटणीस के.सी.त्यागी या वृत्ताचं खंडण करुन, या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे. तर जेडीयूचे प्रवक्ते अजय आलोक यांनी शरद यादव नाराज असल्याचं वृत्त फेटाळलं आहे.

के.सी त्यागी याप्रकरणी म्हणाले की, ''गेल्या 40 वर्षांपासून शरद यादव यांना मी जवळून ओळखतो. भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या बाजूने ते कशाला जातील?'' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

दुसरीकडे जेडीयूचे दोन खासदार अली अनवर आणि विरेंद्र कुमार यांनी शरद यादव यांची भेट घेतली आहे. या दोन्ही खासदारांनी जेडीयूने भाजपसोबत जाण्यास कडाडून विरोध केला आहे.

संबंधित बातम्या

नितीश कुमार सत्तेचे भुकेले, लालूप्रसाद यादव यांचं टीकास्त्र