चेन्नईला वरदा वादळाचा तडाखा
एबीपी माझा वेब टीम | 12 Dec 2016 02:30 PM (IST)
चेन्नई : वरदा चक्रीवादळ चेन्नईला धडकलं आहे. 110/120 प्रती तास वेगाने हे वादळ पुढे सरकत असून, चेन्नईसह आंध्र प्रदेशातही वादळी वाऱ्यासह पाऊल कोसळत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे चेन्नईत जोरदार पाऊस पडत आहे, तर अनेक झाडंही उन्मळून पडली आहेत. जोरदार पावसामुळे चेन्नईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. तर लोकल वाहतूक मंदावली आहे. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारी प्रदेशांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या तुकड्या चेन्नईसह अनेक भागात तैनात करण्यात आल्या आहेत. चेन्नईमधल्या काही विमानांची उड्डाणंही रद्द करण्यात आली आहेत, तर काही विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. लोकल ट्रेनसह अनेक रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. ताशी सत्तर किलोमीटर वेगाने वरदा चक्रीवादळ वाहत असून त्याचा वेग दीडशे किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. वादळामुळे होणारी संभाव्य हानी रोखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पुढचे 48 तास मच्छीमारांनी समुद्रकिनाऱ्यावर जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. चेन्नई, कांचीपुरम आणि तिरुवल्लूरमध्ये शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.