मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा लाडका थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांत. रजनीवरील व्हायरल होणाऱ्या विनोदांमध्ये रजनीकांतला कुठलंही क्षेत्र वर्ज्य नाही, हा त्याचा यूएसपी. मात्र हे जोक्स रजनीकांत खरे ठरवतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. रजनीने राजकारणात उडी घेण्याची हीच योग्य वेळ आहे, असं मत त्याच्या सख्ख्या भावाने व्यक्त केलं आहे.


रजनीकांतने राजकारणात प्रवेश करावा, अशी त्याच्या लाखो-करोडो चाहत्यांची भावना आहे. मात्र आता त्यांच्या इच्छेला सबळ पाठिंबा मिळत आहे. रजनीकांतचे ज्येष्ठ बंधू सत्यनारायण राव यांनी रजनीच्या राजकीय प्रवेशाची इच्छा बोलून दाखवल्याचं वृत्त 'द क्विंट'ने दिलं आहे. मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूतील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर रजनीच्या भावाला ही शक्यता प्रबळ वाटते.

'रजनीकांत तूर्तास वाट पाहील. कदाचित त्याने हातात घेतला सिनेमा पूर्ण करेल. तामिळनाडूच्या राजकारणात काय घडतंय, याचा आढावा घेईल आणि नंतरच निर्णय घेईल' असंही सत्यनारायण राव यांनी 'क्विंट'ला सांगितलं. रजनीकांतसोबत मात्र त्यांनी अद्याप कुठलीही चर्चा केलेली नाही.

तामिळनाडू भाजपकडून रजनीकांतच्या भावाला कोणतीही अपेक्षा नाही. 'रजनीने नवीन पक्ष स्थापन करावा, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. त्याला नक्कीच बहुमत मिळेल. बाकीचे पक्ष लबाड आहेत' असंही ते म्हणतात.

भावाची इच्छा नसली, तरी रजनीकांत यांची भाजपशी जवळीक असल्याचं वारंवार पहायला मिळालं आहे. एप्रिल 2014 मध्ये मोदींनी चेन्नईत घेतलेली रजनीची भेट असो वा, खुद्द रजनीकांतने आपण मोदींचे हितचिंतक असल्याचं सांगणं. 'क्विंट'च्या निरीक्षणात रजनीने केलेल्या 16 राजकीय ट्वीट्सपैकी 5 ट्वीट्समध्ये मोदींना टॅग केल्याचं समोर आलं आहे. इतकंच काय, नोटाबंदीच्या निर्णयानंतर रजनीने

'नव्या भारताचा जन्म झाला आहे. मोदींना सलाम' असा ट्वीट केला होता. भाजपला मात्र रजनीकांतची साथ मोलाची ठरु शकते. तामिळनाडूत 39 खासदार आहेत. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीलाटेतही केवळ एकच जागा मिळवण्यात भाजपला यश आलं होतं.

रजनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांच्या उत्साहाला उधाण येतं, मात्र यंदा मुख्यमंत्री जयललितांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर रजनीकांतने चाहत्यांना बर्थडे साजरा न करण्याचं आवाहन केलं आहे.