देहरादून: उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. तुफान पावसामुळे चमोली भागात ढगफुटी झाली. चमोली जिल्ह्यातील नारायणबगडमध्ये ढगफुटीमुळे अनेक दुकानं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे.


पावसामुळे दरड कोसळल्याने कर्णप्रयाग-ग्वालदम हायवे काही काळ बंद होता. तुफान पावसामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे.

पावसामुळे डोंगराचे कडे कोसळून, मोठ्या प्रमाणात माती, मलबा वाहून येत आहे. त्यामुळेच  कर्णप्रयाग-ग्वालदम महामार्ग बंद ठेवण्यात आला. तर हायवेवरील काही वाहनं पावसात अडकली आहेत.

उत्तर भारतात पाऊस

अचानक आलेल्या या पावसामुळे उत्तर भारतात हाहा:कार उडाला आहे. गेल्या 24 तासात पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये जोरदार पाऊस झाला.

पंजाबमधील अमृतसर आणि राजस्थानमधील अलवरमध्ये पावसाने मोठं नुकसान झालं आहे. अमृतसरमध्ये काढणी झालेली पीकं, धान्य भिजलं आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावल्याची भावना इथल्या शेतकऱ्यांची आहे.

राजस्थानातील अलवरमध्ये  वादळी वारा आणि पावसाने तिघांचा मृत्यू झाला आहे. अनेक झाडं उन्मळून रस्त्यावर पडली आहेत. वीजेचे खांब, तारा तुटून खाली कोसळल्या आहेत.