लखनौ : जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे. तसेच देशभरातील सर्व राज्य आणि शहरांच्या एटीएस (दहशतवाद विरोध पथकं) सर्वत्र कसून तपास करत आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरजवळच्या देवबंद येथून जैश-ए-मोहम्मदच्या या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे.

शाहनवाझ आणि आबिक अहमद मलिक अशी अटक केलेल्या दोन दहशतवाद्यांची नावं आहेत. शाहनवाझ हा मुळचा जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथील रहिवासी आहे. तो जैशमध्ये तरुणांना भरती करतो, असा त्याच्यावर आरोप आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली असल्याचे यूपीचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी सांगितले.

पोलीस महासंचालक सिंह म्हणाले की, "शाहनवाझ आणि आबिकला ट्रान्जिट रिमांडसाठी अटक केली असून लवकरच या दोघांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे." उत्तर प्रदेश पोलीस प्रशासन आणि एटीएस दोघांनीही या दहशतवाद्यांविरोधात अधिक पुरावे गोळा करण्यासाठी कंबर कसली आहे. या दहशतवाद्यांना पैसा कोठून मिळतो, याबाबतची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

पुलवामा येथेली दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु केली आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश एटीएसच्या हाती हे दोन दहशतवादी लागले आहेत. काश्मीर खोऱ्यासह दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये एटीएस आणि पोलिसांनी दहशतवाद्यांबाबतची माहिती गोळा करण्यासाठी जंग जंग पछाडले आहे.