माजुली/ आसाम : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी शुक्रवारी आसाममधील एका सभेला संबोधित करत असताना, त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर डॉक्टरांच्या टीमने वेळीच मंचावर धाव घेऊन, त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं सांगितलं.


नितीन गडकरींनी शुक्रवारी आसामच्या माजुलीमध्ये ब्रम्हपुत्रा नदीत मालवाहतूक करणाऱ्या जहाजाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी एक तास जनतेला संबोधित केलं. मात्र, यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.

यानंतर डॉक्टरांच्या एका टीमने तात्काळ मंचावर धाव घेऊन, त्यांची तपासणी केली. यावेळी डॉक्टरांनी त्यांची शुगर आणि रक्तदाब यांची तपासणी केली, आणि त्यानंतर त्यांना खाण्यासाठी एक केळही दिलं.

तसेच स्पीकरचा आवाजही अतिशय कमी केला होता. शिवाय, त्यांना आराम मिळावा यासाठी मंचावरच पेडेस्टल पंखा लावण्यात आला होता.

दरम्यान, त्यांच्या तपासणीनंतर माजुलीचे जिल्हा रुग्णालयातील अधिकारी शशिधर फुका यांनी सांगितलं की, गडकरींचा रक्तदाब वाढल्याने, त्यांना अस्वस्थ वाटत होतं. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.