नवी दिल्ली : देशात बेरोजगारीचा दर सातत्याने वाढत आहे. मार्च 2019 मध्ये देशात बेरोजगारीचा दर 6.7 टक्के इतका होता. त्यामध्ये आता वाढ होऊन एप्रिल 2019 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर 7.6 टक्क्यांवर पोहोचला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेने यासंबधीची आकडेवारी जाहीर केली आहे.


देशभरात असंख्य तरुणांकडे रोजगार नसल्यामुळे विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. तर सरकार मात्र ही बाब मान्य करत नाही. परंतु सीएमआयईने बेरोजगारीच्या दरासंदर्भात जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनंतर विरोधकांना सरकारवर टीका करण्यासाठी आणखी एक कारण मिळाले आहे, तर ही आकडेवारी केंद्र सरकारची डोकेदुखी वाढवणारी असल्याची चर्चा सुरु आहे.

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात बेरोजगारीचा दर वाढल्यामुळे सध्या देशभरात सुरु असलेल्या निवडणुकीवर त्याचे परिणाम होतील असे बोलले जात आहे. 19 मेपर्यंत लोकसभा निवडणूकीसाठी मतदान सुरु असणार आहे. अद्याप तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. या तीन टप्प्यातील मतदानावर या नव्या आकडेवारीचा परिणाम होऊ शकतो, असेदेखील बोलले जात आहे.

डिसेंबर 2018 मध्ये बेरोजगारीच्या दरासंदर्भातील आकडेवारी लिक झाली होती. त्यामध्ये म्हटले होते की, वर्ष 2017-18 मध्ये देशात गेल्या 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारीची नोंद झाली आहे. तसेच त्यामध्ये म्हटले होते की, नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी लागू केल्यानंतर देशभरात बेरोजगारी वाढू लागली. 2017-18 मध्ये तब्बल 1 कोटी 10 लाख लोकांनी त्यांचा रोजगार गमावला आहे.