Ugliest Language in India: गुगल सर्च (Google Search) वर आपल्याला कोणत्या गोष्टीचे काय रिझल्ट येतील सांगता येत नाही. आता सध्या अशाच एका विषयावरुन रान पेटलं आहे. गुगलला विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरामुळं कन्नड भाषिक चांगलेच संतापले. त्यांचा संताप पाहून गुगलला अखेर माफी मागून ते उत्तरही डिलिट करावं लागलं. हा विषय आहे Ugliest Language in India  म्हणजे भारतातील सर्वात खराब भाषा कोणती? या प्रश्नाच्या उत्तराचा. गुगलनं या प्रश्नाचं उत्तर कन्नड भाषा असं दिलं. यामुळं कन्नड भाषिक चांगलेच नाराज झाले आणि त्यांनी गुगलवर (Google India) कारवाई करण्याची मागणी करत माफी मागण्यास भाग पाडले. 


झालं असं की, गुगलवर ज्यावेळी भारतातली सर्वात खराब भाषा कोणती? (Ugliest Language in India) असं विचारलं त्यावेळी गुगलनं कन्नड असं उत्तर दिलं. कन्नड ही जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक भाषा आहे. भारतात जवळपास 6 कोटी लोकं कन्नड भाषा बोलतात आणि लिहितात.  


कन्नड भाषिकांचा संताप अनावर


गुगल सर्चमध्ये मिळालेलं हे उत्तर पाहून कन्नड भाषिकांचा संताप अनावर झाला. सोशल मीडियावर कन्नड प्रेमींनी गुगलवर टीकेची झोड उठवली आणि गुगल इंडियाविरुद्ध कारवाईची मागणीही केली. ट्वीटरवर गुगलविरोधात ट्रेंड केला जाऊ लागला. माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी देखील ट्वीट करत गुगलवर टीका केली. त्यांनी म्हटलं की भाषेच्या मुद्द्यावर गुगलचं असं बेजबाबदार वागणं योग्य नाही.  बंगळुरु सेंट्रल चे BJP खासदार पीसी मोहन यांनी याबाबत गुगलनं माफी मागावी अशी मागणी केली. मोहन यांनी गुगल सर्चचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हटलं की, कर्नाटकात महान विजयनगर साम्राज्य तथा कन्नड भाषेचा समृद्ध इतिहास आणि अनोखी संस्कृती आहे. जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी कन्नड ही एक भाषा आहे. गुगल इंडियानं माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.  






यानंतर जोरदार गोंधळ झाल्यानंतर गुगलनं या उत्तराला आपल्या सर्च रिझल्टमधून काढून टाकलं आहे. एकीकडे सर्च रिझल्टमध्ये कन्नड ही सर्वात खराब भाषा असल्याचं सांगितलं जात होतं तर दुसरीकडे कन्नडला जगातील भाषेची राणी असं देखील म्हटलं जात होतं.  


गुगलनं मागितली माफी


यासंदर्भात Google इंडियानं ट्वीट करत म्हटलं आहे की, गुगलवरील सर्च रिझल्ट हा नेहमी परफेक्ट नसतो. अनेकदा इंटरनेटवर अशा प्रकारचे रिझल्ट येत असतात. त्यांनी म्हटलं की आम्हाला कल्पना आहे की, जे घडलं आहे ते नक्कीच चूक आहे. मात्र अशा चुका आमच्या लक्षात येताच आम्ही तत्काळ त्या दुरुस्त देखील करतो. आम्ही आमचा अल्गोरिदम सुधारण्यावर नेहमी भर देत असतो असतो. आम्ही या चुकीमुळं ज्यांच्या भावना यामुळं दुखावल्या आहेत, त्यांची माफी मागतो, असं त्यांनी म्हटलं आहे.