अयोध्या : राममंदिर उभारण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. राममंदिरासाठी किती दिवस वाट बघावी लागणार असल्याचा सवाल करत राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा, अशा शब्दात उध्दव ठाकरेंनी सरकारला इशारा दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. या पूजेनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद केला.


आता हिंदू वाट बघणार नाही, तो प्रश्न विचारणारच असे सांगत संसदेत कायदा केला तर शिवसेना पाठीशी राहिल मात्र राम मंदिर कधी उभारणार याची तारीख सांगा असे ठाकरे म्हणाले. अयोध्येत रामाच्या दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही असे सांगत पहिल्यांदाच अयोध्येत आलोय, आता वारंवार येत राहणार असेही ते म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी कायदा करून राम मंदिर उभारावे अशी मागणी केली. मोदींनी दिलेला शब्द पाळला नाही, अशी टीका करत दिलेला शब्द मोदी सरकारने पाळावा असेही त्यांनी म्हटले. यावेळी ठाकरे कुटुंबियांच्या हस्ते संकल्प पूजन केले. या आशिर्वाद उत्सवाला संत महंतांनी हजेरी लावली होती.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वीच शिवनेरीहून आणलेल्या मातीची अयोध्येत पूजा केली. राम मंदिर बांधले पाहिजे त्यासाठी अध्यादेश काढला गेला पाहिजे अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्यासाठी ते दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत.

इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन केले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
 - आजचा दिवस माझ्या आयुष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा
-  श्रीरामांचे मंदिर व्हायलाच हवे.
- झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला आलोय.
- आता चला आपण सर्व मिळून मंदिर बनवू.
- अनेक महिने वर्षे झाली पण राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागला नाही.
- आता मला राम मंदिर बांधणी कधी होणार याची तारीख हवी
- अध्यादेश आणायचा असेल तर सरकारने तो आणावा.
- राम मंदिरासाठी कायदा आणत असाल तर तेही सांगावे.
- नोटांबदीचा निर्णय घेतला त्याप्रमाणे हा देखील निर्णय घ्यावा.
- तुम्ही विसरलेल्या वचनांची माहिती देण्यासाठी आज मी येथे आलोय.
- मंदिर बनविण्यासाठी हिंमत लागते. छाती कितीही मोठी असली त्यामध्ये मर्दासारखे हृदय असणे गरजेचे आहे.
- आता हिंदू गप बसणार नाही.
- 'हर हिंदू की एक पुकार पहले राम मंदिर फिर सरकार'

LIVE UPDATE

दुपारी 3.30 वाजता - उद्धव ठाकरे 'लक्ष्मण किला'वर दाखल

युतीच्या दिशेने सकारात्मक पाऊल, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचं स्वागत

दुपारी 3 वाजता - उद्धव ठाकरे सहकुटुंब 'लक्ष्मण किला'च्या दिशेने रवाना

चांगल्या गोष्टीसाठी मित्राने केलेल्या स्पर्धेत गैर काय? उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांच्या भावना

दुपारी 1.30 वाजता- उद्धव ठाकरे सहकुटुंब फैजाबाद विमानतळावर दाखल

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा युती शक्य, अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींचं वक्तव्य

सकाळी 11 वाजता - ठाकरे कुटुंब मुंबई विमानतळावरुन विशेष विमानाने रवाना

सकाळी 10.30 वाजता - उद्धव ठाकरे 'मातोश्री'वरुन सहकुटुंब मुंबई विमानतळाच्या दिशेने रवाना

ठाकरे कुटुंबातून उत्तर भारतामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दोनवेळा गेले होते. एकदा कोर्टाच्या कामासाठी तर दुसऱ्यांदा 'सहारा'चे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्या लग्नासाठी ते उत्तर प्रदेशात गेले होते. त्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंब अयोध्या वारीच्या निमित्ताने उत्तरेत जात आहे.

निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा राम मंदिराचा मुद्दा उचलला जात आहे. शिवसेनेनेही राम मंदिराचा मुद्दा उचलून धरल्याचं दिसत आहे. शिवसेनेने अयोध्येत रॅलीचं आयोजन केलं आहे. अयोध्येत उद्या (रविवारी) उद्धव ठाकरे सभेला संबोधित करतील.

उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम

अयोध्येतल्या क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे वेगवेगळे समाज, भोजपुरी सभा यांच्याकडून उद्धव ठाकरे यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. 'लक्ष्मण किला'वर उद्धव ठाकरे यांचा साधूसंतांकडून सत्कार होणार आहे. रामचरित मानस आणि रामललांची मूर्ती घेऊन दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे येणार आहेत. पूजेनंतर ते साधूसंतांकडून आशीर्वाद घेतील. 'लक्ष्मण किला'वरील कार्यक्रम संपल्यानंतर संध्याकाळी 5.15 वाजता उद्धव ठाकरे चालत शरयूच्या काठावर जाऊन आरती करतील.

दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता उद्धव ठाकरे राम जन्मभूमीत रामललांचं दर्शन घेतील. दुपारी 12 वाजता पत्रकारांशी तर एक वाजता जनतेशी हिंदी भाषेत संवाद साधतील.

शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या मातीचा कलश घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत जात आहेत. शिवनेरीवर बाल शिवाजी आणि जिजामाता यांना अभिवादन करुन उद्धव ठाकरेंनी माती सोबत घेतली आहे. संजय राऊत, राजन विचारे, एकनाथ शिंदे, विश्वनाथ महाडेश्वरही अयोध्येला गेले आहेत.

उद्धव ठाकरे हिंदीत भाषेत भाषण देणार

अयोध्येत उद्धव ठाकरे हिंदी भाषेत भाषण देणार आहेत. हिंदीतले भाषण अधिक धारधार व्हावं, म्हणून उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेची शिकवणी लावल्याचं वृत्त 'दैनिक भास्कर'ने दिलं होतं. उद्धव यांना उत्तम हिंदी बोलता येते, परंतु त्यांना हिंदीत प्रभावी भाषण देता येणार नाही. त्यामुळे भाषा पक्की करण्यासाठी त्यांनी शिकवणी सुरु केल्याचं म्हटलं जातं. या अगोदर उद्धव यांनी कधीही हिंदीत भाषण केलेलं नाही. त्यांनी याआधी लहानमोठ्या पत्रकार परिषदा हिंदी भाषेत घेतल्या आहेत. पंरतु मोठ्या जनसामुदायासमोर त्यांनी हिंदीत भाषण केलेलं नाही. अयोध्येतील मंदिराचा इतिहास, त्यासाठी झालेली आंदोलनं हे उद्धव यांच्या भाषणाचे मुख्य मुद्दे असतील, असं मानलं जातं.

व्यापाऱ्यांचा विरोध मावळला

शिवसेनेबद्दल यूपीतील जनतेच्या मनात थोडीशी धाकधूक होती. शिवसेना उग्र संघटना असल्याचा अयोध्येतील स्थानिकांचा समज आहे. व्यापाऱ्यांच्या मनातही गर्दीची धास्ती होती. या कार्यक्रमामुळे काही दिवस प्रवेशबंदी होऊन लोकांना आत प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान होतं. ही गर्दी म्हणजे ग्राहक नसल्याने व्यापारी चिंताग्रस्त होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या व्यापाऱ्यांचा विरोध आता मावळला आहे.
इतिहास अयोध्याकांडाचा...

विरोध करणारे अयोध्येतले व्यापारी आता चक्क उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी हजर राहणार आहेत. रॅलीचा व्यापाराला कुठलाही फटका बसू नये, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी व्यापाऱ्यांची भेट घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली भूमिका बदलली.

अयोध्येत सुरक्षा व्यवस्थेत वाढ

सध्या अयोध्येला सुरक्षा व्यवस्था वाढलेली असून एका किल्ल्याचं स्वरुप आलं आहे. संपूर्ण शहरात सीआरपीएफ, पीएसी आणि पोलिसांच्या तुकड्या तैनात आहेत. ड्रोन कॅमेराने निगराणी करण्यात येत असून राम जन्मभूमीला चारही बाजूंनी सुरक्षेचा वेढा आहे.

मुंबईकर उत्तर भारतीयांचा पाठिंबा

मुंबईतील उत्तर भारतीयसुद्धा या दौऱ्याला पाठिंबा देत आहेत. राज्यभरातील विविध भागातून शिवसैनिक अयोध्येला आले आहेत. पुण्यातील शिवैसनिक बाईकने तर नाशकातील शिवसैनिक विशेष ट्रेनने अयोध्येला आले.

वारकरी अयोध्येला

आषाढी-कार्तिकीला पंढरीची वाट धरणारे वारकरी राम जन्मभूमी अयोध्येला आले. शिवसैनिकांच्या 'जय श्रीराम' एक्स्प्रेसमध्ये वारकरीही सहभागी झाले होते. अयोध्येत रामाचं भव्य मंदीर उभं रहावं अशी त्यांचीही मागणी आहे.

शिवसैनिकांचा ड्रेसकोड

नाशिकहून अयोध्येला जाणाऱ्या शिवसैनिकांना ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. पांढऱ्या रंगाच्या टीशर्टवर पुढच्या बाजूला 'चलो अयोध्या'चा नारा आणि श्रीरामाची प्रतिमा, तर मागील बाजूला बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य ठाकरे यांचा फोटो, आपापल्या जिल्ह्याचं नाव आहे. अयोध्येत गेल्यावर सर्व शिवसैनिक एकसंघ दिसावेत, यासाठी ड्रेस कोड ठरवण्यात आला आहे. टोपीवर एका बाजूला जिल्ह्याचं नाव आणि दुसऱ्या बाजूला जय श्रीरामचा नारा आहे.

हर हिंदू की यही पुकार...

अयोध्या दौऱ्यावेळी महिला आघाडी आणि युवासेनेनं अयोध्येत येऊ नये, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते. महिलांना लक्ष्मणरेषा पाळण्याचं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं होतं. अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी “हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार” असा नवा नारा दिला.

आखाडा परिषदेने निमंत्रण धुडकावलं

साधूसंतांची सर्वात मोठी संस्था अखिल भारतीय आखाडा परिषदेने शिवसेनेचं आमंत्रण केवळ धुडकावलंच नाही तर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर राजकीय खेळी केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. "आखाड्याशी संबंधित साधू-संत शिवसेनेच्याच नाही तर 25 नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमातही सहभागी होणार नाहीत," असं आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी स्पष्ट केलं होतं.