पणजी (गोवा) : भाजप हा सत्तांध पक्ष असून, सत्ता आली की त्यांना काहीही दिसत नाही, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला. गोवा विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी स्वत: उद्धव ठाकरे गोव्यात दाखल झाले आहेत. यावेळी पणजीतील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.


भाजपवर घणाघात

"भाजप हा सत्तांध पक्ष आहे. सत्ता आली की भाजपला काहीही दिसत नाही. गरज पडेल तेव्हा भाजपसाठी शिवसेना मित्र आणि गरज नसेल तर शत्रू.", असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर घणाघात केला.

"मराठी आमची माय आणि कोकणी आमची मावशी आहे. शिवसेना आणि कोकण हे घट्ट नातं आहे. वज्रमूठ आहे. आम्ही वेलिंगकरांशी मैत्री करुन पुढे जाऊ. गोव्यात सत्तेत शिवसेनाच असेल.", अशा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

मनोहर पर्रिकरांना टोला

संरक्षणंत्री मनोहर पर्रिकर यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षणाला दिलं. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "संघाची शिकवण चांगली आहेच. पण आपल्या जवानांच्या शौर्यांचं श्रेय कमी लेखू नका."

"गोव्यात प्रत्येक गावात सेनेची शाखा हवी"

"मला गोव्याच्या प्रत्येक गावात शाखा हवी आहे. तुम्ही शाखा उघडा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. जे मुंबईत करतोय तेच इथे करेन. ज्या गावात शाखा उघडाल, तिथे मी स्वतः शाखेला भेट द्यायला येईन.", असं आश्वासनही उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलं.

गोव्यातील सत्ताधाऱ्यांना टोमणा

"मला गोव्यात यायला उशीर झाला. कारण विमानतळावर फॉग आहे, असं मला सांगण्यात आलं. गोव्याच्या राजकारणात पण फॉग असल्यासारखी परिस्थिती आहे. इथेच काहीच स्पष्ट नाही.", अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी गोव्यातील सत्ताधाऱ्यांना टोमणा मारला. शिवाय, शिवसेना गोव्यात पर्यटक म्हणून आलेली नाही, तर गोवा घडवायला आलेली आहे, असे सांगायलाही उद्धव ठाकरे विसरले नाहीत.