जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, अनंतनागमध्ये चकमक सुरु
एबीपी माझा वेब टीम | 18 May 2019 10:39 AM (IST)
सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार पुलवामात काल रात्री दोन वाजता सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्य़े चकमक सुरु झाली. यात भारतीय लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दलानं चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. पुलवामातील पंजगाम गावात भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय, तर दोन ते तीन दहशतवादी लपल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुलवामासह अनंतनागमध्येही भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरु आहे. सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार पुलवामात काल रात्री दोन वाजता सुरक्षा दलांमध्ये आणि दहशतवाद्यांमध्य़े चकमक सुरु झाली. या चकमकीत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. यातील एकाची ओळख पटण्यात यश आलं आहे. शौकत अहमद डार असं या दहशतवाद्याचं नाव आहे. हा दहशतवादी पुलवामा भागात गेल्या चार वर्षांपासून सक्रिय होता. तसेच भारतीय सेनेचा जवान औरंगजेबच्या हत्येमागेही याचा हात असल्याचे बोलले जात आहे. तर दुसऱ्या दहशतवाद्याचं नाव अद्याप जाहीर केलेलं नाही. या कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. अनंतनागमधील देहरुना गावात चकमक सुरुच जम्मू- काश्मीरमधील अनंतनागमधील देहरुना गावात भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. भारतीय लष्कराने अतिरेक्यांना चहूबाजूंनी घेरण्यात आलं आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरु आहे. तसेच भारतीय लष्कराकडून परिसरात शोधमोहीमसुद्धा राबवली जात आहे. VIDEO | 2008 ते 2014 दरम्यान यूपीएकडून सहा वेळा सर्जिकल स्ट्राईक? | नवी दिल्ली | एबीपी माझा