नवी दिल्ली : पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी भारतीय वायू सेनेनं बदला घेतला. वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याचदरम्यान काश्मीर खोऱ्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. काल रात्री काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने मोठी कारवाई करत दोन दहशतवादी ठार केले आहेत.


काल रात्री काश्मीरच्या शोपियामधील मेमरलॅन्ड भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शोपियामध्ये सर्च ऑपरेशन राबवले. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच अजूनही एक दहशतवादी शोपियामध्ये लपला असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे.

24 फेब्रुवारीच्या रात्रीदेखील जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षाबलामध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलीस उप अधीक्षक अमन ठाकूर शहीद झाले. तसेच या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.

व्हिडीओ पाहा



दरम्यान, भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मंगळवारी बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान बावचळला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करत आहेत. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे 5 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यांना भारतानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार झाले आहेत.