नवी दिल्ली : पासपोर्ट प्रकरणावरून परराष्ट्र मंत्री सुषमा  स्वराज यांच्यावर सोशल मीडियातून  असभ्य भाषेत टीका करण्यात आली आहे. हिंदू-मुस्लिम दाम्पत्याला पासपोर्ट नाकारल्यामुळे काही दिवसांपूर्वी मोठा वाद निर्माण झाला. त्यावेळी परराष्ट्र मंत्रालयाकडून पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली होती.


याच मुद्यावर सोशल मीडियावर सुषमा स्वराज यांना ट्रोल करण्यात आलं. या ट्रोलर्सने ट्वीट करताना भाजपलाही टॅग केले आहे. ट्रोलर्सने असभ्य कमेंट्स करत केलेले ट्वीट  सुषमा स्वराज यांनी रिट्विट केले आहेत.



सुषमा स्वराज यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. “मी 17 जून ते 23 जून या काळात भारताबाहेरच होते. त्यावेळी येथे काय घडले याची मला काहीच कल्पना नव्हती. पण सोशल मीडियात करण्यात आलेल्या काही ट्वीट्समुळे मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे,”  अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.


काय आहे पासपोर्ट प्रकरण?

उत्तर प्रदेशातील हिंदू – मुस्लीम दांपत्याला एका अधिकाऱ्याकडून पासपोर्ट नाकारण्यात आला. मुस्लीम धर्मीय पतीला धर्म बदलायला सांगितलं गेल्याचंही बोललं जातंय. हे सर्व प्रकरण समोर येताच पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं. तसंच त्या हिंदू-मुस्लीम दाम्पत्याला पासपोर्टही देण्यात आला होता.