नवी दिल्ली: महाराष्ट्र सरकारने कृष्णा खोऱ्याच्या पाण्याची लढाई जिंकली आहे. महाराष्ट्राला आता कृष्णा खोऱ्याचं पाणी अन्य राज्यांना वाटून द्यावं लागणार नाही. कृष्णा खोऱ्याच्या पाण्याचं चार राज्यामध्ये फेरवाटप होणार नाही. त्याबाबतचा निर्णय केंद्रीय जल आयोगाने दिला आहे.


काय आहे वाद?

तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणात पाणी वाटप कसं व्हावं याबद्दलचा हा वाद होता. पण या वादात महाराष्ट्राला ओढण्यात आलं होतं.

मात्र आंध्र-तेलंगणाच्याच पाणी वाटपाचा वाद आहे, तर प्रकल्पानुसार विभागणी करा, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने मांडली.

पण महाराष्ट्राच्या भूमिकेवर तेलंगणाच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता. महाराष्ट्राच्या भूमिकेमुळे तेलंगणावर अन्याय होत असल्याचा दावा वकिलांनी केला होता.

मात्र केंद्रीय जल आयोगाने तेलंगणासाठी आंध्राच्या कोट्यातूनच पाणी द्यावं असे आदेश दिले. त्यामुळे महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला आहे.