नवी दिल्ली: आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, हे अधिवेशन नोटाबंदीच्या निर्णयामुळे चांगलंच तापण्याची शक्यता आहे. त्यासाठी काँग्रेसनं रणनितीही आखली असल्याचं समजतं आहे.


हिवाळी अधिवेशनात निवडणुकीत होणारा खर्च आणि एकत्रित निवडणूका या मुद्द्यांवर चर्चा करावी अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली आहे. दिल्लीमध्ये अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली. त्यात मोदींनी सर्वांना ही विनंती केली आहे.

दरम्यान, नोटाबंदीच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राष्ट्रपती भवनपर्यंत ते मोर्चा काढणार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या मोर्चामध्ये शिवसेनेचे खासदारही सहभागी होणार आहेत.

मातोश्रीवरील खासदारांच्या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी फोनवरुन चर्चा केली. यानंतर उद्धव ठाकरेंनी नोटाबंदीविरोधात विरोधकांच्या मोर्चात शिवसेना सहभागी होणार असल्याची घोषणा केली.

काळ्या पैशांवर सर्जिकल स्ट्राईक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्याची घोषणा केली. काळा पैशांवर आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं मोदींनी सांगितलं.

परंतु विरोधकांनी मोदी सरकारच्या या निर्णयाला विरोध केला. विशेष म्हणजे शिवसेना वगळता एनडीएच्या सगळ्या घटकपक्षांनी पंतप्रधान मोदींनी काळ्या पैशांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचं कौतुक केलं.

‘मोदींना पवार चालतात, मग सेनेला ममता बॅनर्जी का नाही?

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शरद पवार चालू शकतात, तर मग शिवसेनेला ममता बॅनर्जी का नाही? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदारांची ‘मातोश्री’वर बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. “आम्ही मोदींच्या विरोधात नाही, मात्र हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसोबत राष्ट्रपतींकडे जायला हरकत काय? आम्ही मोदींच्या विरोधात नाही तर जनतेच्या हितासाठी ममतांसोबत जाऊ शकतो”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.