लखनऊ : संपूर्ण देश काळ्या पैशाविरोधात एकवटला असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. काळ्या पैशामुळेच भारतीय अर्थव्यवस्थेला हातभार लागला आहे, असं अखिलेश यादव म्हणाले.


काळ्या पैशांचं आपण समर्थन करत नाही. मात्र अर्थतज्ञांच्या मते, जागतिक मंदीच्या काळात काळ्या पैशानेच भारतीय अर्थव्यवस्थेला सावरलं, असं विधान अखिलेश यादव यांनी केलं.

सरकारने नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा सरकारविरोधी आहे. जनता या सरकारला पुन्हा निवडून देणार नाही. कारण या निर्णयाचा सर्वाधिक फटका सामान्य जनतेला बसला आहे. काळ्या पैशांवाल्यांना या निर्णयाने काहीही फरक पडणार नाही, असं अखिलेश यादव म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी या निर्णयाचं समर्थन केलं. मात्र अखिलेश यादव यांच्या या वादग्रस्त विधानाने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.