खा. रवींद्र गायकवाडांवरील विमानबंदी मागे घेण्याची शक्यता: सूत्र
एबीपी माझा वेब टीम | 06 Apr 2017 03:27 PM (IST)
नवी दिल्ली: शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी आज मागे घेण्यात येण्याची शक्यता आहे. कारण की, खा. याप्रकरणी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र देणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. यापुढे पुन्हा असं वर्तन होणार नाही अशा आशयाचं पत्र गायकवाड लोकसभा अध्यक्षांना देणार असल्याचं समजतं आहे. या पत्रानंतर त्यांच्यावर घालण्यात आलेली हवाई बंदी उठवण्याची घोषणा होऊ शकते. याप्रकरणी खा. रवींद्र गायकवाड यांच्यावर लावण्यात आलेलं ३०८ हे कलम वगळण्यासाठीही गृहमंत्री राजनाथ सिंह सकारात्मक असल्याचं दिसून आलं आहे. मात्र, हे कलम हटवण्यासाठी थोडा वेळा लागणार आहे. दरम्यान, आज शिवसेना खासदारांनी याप्रकरणी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. बऱ्याच दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. याबाबत शिवसेनेनं हक्कभंग प्रस्तावही दाखल केला होता. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे आज शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी खा. गायकवाड यांनी आपलं निवदेन मांडलं. आपण लोकसभेची माफी मागतो. पण एअर इंडियाची माफी मागणार नाही. असंही ते यावेळी म्हणाले. याचवेळी शिवसेनेचे मंत्री अनंत गिते यांनीही गायकवाडांची बाजू लावून धरली. त्यामुळे आता या सर्व प्रकरणी लोकसभा अध्यक्षा नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे. लोकसभेत नेमकं काय म्हणाले रवींद्र गायकवाड? ‘एअर इंडिया आणि विमान कंपन्यांनी माझ्यावर आतापर्यंत अन्याय केला आहे. मी एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती. मला धक्काबुक्की केल्यानंतर मी फक्त त्या अधिकाऱ्याला ढकललं होतं.’ ‘मी बिझनेस क्लासचं तिकीट काढलेलं असतानाही मला इकोनॉमी क्लासमध्ये बसवलं गेलं. त्यानंतर मी तक्रार करण्यासाठी नोंदवही मागितली. मात्र, तेव्हा त्यांनी ते देण्यास नकार दिला. मी निषेध नोंदवण्यासाठी तिथंच बसून राहिलो. त्यानंतर तब्बल 45 मिनिटांनी एक अधिकारी आला. मी त्याला विचारलं की, तुम्ही कोण? त्यावेळी त्यानं मला अत्यतं अरेरावीनं उत्तर दिलं.’ ‘तो अधिकारी मला म्हणाला की, ‘मी एअर इंडियाचा बाप आहे.’ तेव्हा मी त्याला सांगितलं की, मी खासदार आहे. तेव्हा तो मला म्हणाला की, ‘तू काय नरेंद्र मोदी आहेस का?’ असं म्हणत त्यानं माझ्याशी पुन्हा अरेरावी सुरु केली. यावेळी मला धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी माझा संयम सुटल्यानं मी त्या अधिकाऱ्याला ढकललं. तिथं हजर असणाऱ्या एअर होस्टेस्टनं देखील नेमकं काय झालं ते सांगितलं आहे. माझं वागणं चुकीचं नव्हतं.’ ‘संविधानानं मला कुठंही प्रवास करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, एअर इंडिया आणि इतर विमान कंपन्यांनी माझ्या विमान प्रवासावर बंदी आणून मला संविधानानं दिलेला अधिकार हिरावून घेतला आहे. मी एक शिक्षक आहे. विन्रमता ही माझी शिकवण आहे. त्यामुळे जर माझी चूक झाली असेल तर मी संसदेची माफी मागतो, पण एअर इंडिया आणि त्या अधिकाऱ्याची माफी मागणार नाही.’ ‘याप्रकरणी माझ्यावर मीडिया ट्रायलही करण्यात आलं. पण त्या दिवसापासून मी मीडियाच्या हाती लागलो नाही. आज थेट मी संसदेत हजर झालो. गनिमी काव्यानं कसं लढायचं हे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं आहे. दरम्यान, याप्रकरणी माझ्यावर दाखल करण्यात आलेलं 308 कलम हटवावं. तसेच एअर इंडिया आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रवींद्र गायकवाड यांनी केली. संबंधित बातम्या: मी मारलं नाही, त्या अधिकाऱ्याला फक्त ढकललं: रवींद्र गायकवाड 'सुरक्षेशी कोणतीही तडजोड नाही', हवाईमंत्र्यांनी गायकवाडांना ठणकावलं! सरकारच्या एकतर्फी निर्णयाची लाज वाटते : खा. अनंत गीते