भिवंडी (ठाणे) : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आज भिवंडी कोर्टात हजर राहावं लागणार आहे. महात्मा गांधींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणली, असं वक्तव्य राहुल गांधींनी जाहीर सभेत केलं होतं. त्यासंदर्भातील प्रकरणात आज आरोप निश्चिती केली जाणार आहे.


राहुल गांधींविरोधात संघाचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिंवडी कोर्टात याचिका दाखल केली. तेव्हापासून भिवंडी कोर्टात सुनावणी सुरु आहे. आणि आज आरोप निश्चितीसाठी राहुल गांधींना कोर्टात हजर राहावं लागणार आहे. गुन्हा कबुल आहे किंवा नाही? अशी विचारणा करुन दोषारोपपत्र निश्चित केलं जाईल.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी 15 व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत केले होते. यानंतर संघाचे शहर जिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या याचिकेच्या न्याय निवाड्यानुसार 30  जानेवारी रोजी राहुल गांधी यांना न्यायालय गुन्हा कबूल आहे किंवा नाही? अशी विचारणा करून दोषारोप निश्चित करणार आहे. त्यामुळे आज राहुल गांधी पुन्हा एकदा भिवंडी न्यायालयात हजर राहणार आहेत.