नवी दिल्ली : दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमध्ये वादळाचा कहर पाहायला मिळतो आहे. आतापर्यंत या वादळात एकूण 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यात दिल्लीतील 2, उत्तर प्रदेशमधील 13 आणि पश्चिम बंगालमधील 9 जणांचा समावेश आहे.


आज दुपारी दिल्लीत अचानक अंधार दाटून आला. धुळीसह वेगानं वारे वाहू लागले. पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या, मात्र आता वादळानं आक्रमक रुप धारण केलं आहे. गुरुग्राम आणि दिल्ली-एनसीआर परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोलमडली.

रविवारी दुपारपासून वादळामुळे जवळपास 189 झाडं उन्मळून पडली आहेत. तर 40 हून अधिक विजेचे खांब पडले आहेत. या वादळात 18 जण जखमी झाले आहेत. वाऱ्याच्या वेगानं लग्नसमारंभातली मंडपही कोसळली आहेत.

आता हे वादळ ईशान्य भारताच्या दिशेने सरकलं आहे. तसंच हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर ओदिशात जोरदार पावसाची शक्यता आहे.