श्रीनगर : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय जवानांना मोठं यश आलं आहे. त्रालमध्ये झालेल्या या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या ऑपरेशन कमांडरसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.


पोलिसांना घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर या भागात सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. ज्यामध्ये या तिघांचा खात्मा करण्यात आला.

या चकमकीनंतर आता दोन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून एकाचा शोध सुरु आहे. दरम्यान या घटनेत सीआरपीएफचा एक जवान आणि भारतीय सैन्यातील एक जवान जखमी झाला. मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन जण स्थानिक आहेत, तर एक परदेशी आहे.

मारण्यात आलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या या संघटनेचे आहेत. रमजान संपल्यानंतर सुरक्षा दलाने पुन्हा एकदा ऑपरेशन ऑलआऊट सुरु केलं आहे, ज्यामुळे दहशतवादविरोधी कारवायांना वेग आला आहे. आतापर्यंत सात दहशतवाद्यांना मारण्यात आल्याची माहिती एसपी वैद यांनी ट्विटरवरुन दिली.

शस्त्रसंधी मागे

रमजान महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी केंद्रीय गृह मंत्रालयाने मागे घेतली आहे. केंद्र सरकारकडून ‘सस्पेंशन ऑफ ऑपरेशन’ या मिशनअंतर्गत 17 मे 2018 ला शस्त्रसंधी लागू करण्यात आली होती.

याअंतर्गत दहशतवाद्यांविरोधात चालू असलेल्या ‘ऑपरेशन ऑलआऊट’ला स्थगिती देण्यात आली होती.

शस्त्रसंधी लागू असली तरी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर लष्कराकडून लगेच चोख प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. शस्त्रसंधी मागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा  दहशतवाद्यांविरोधात ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरु करण्यात आलं आहे.