सलगच्या सुट्ट्यांमुळे तीन दिवस बँका बंद
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2017 07:59 AM (IST)
फाईल फोटो
मुंबई : आजपासून सलग तीन दिवस देशातल्या सर्व बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रोखीचे व्यवहार करणाऱ्यानां पैशांची चणचण भासू शकते. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आज, चौथा शनिवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असते. तर उद्या रविवार आणि सोमवारी ईदनिमित्त सर्वच बँकांना सुट्टी राहणार आहे. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागणार आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सणासुदीच्या काळात एटीएममधून मोठ्याप्रमाणात रोख रक्कम काढली जाते. त्यामुळे एटीएम रिकामे होऊ नयेत, यासाठी एटीएममध्ये पुरेशी रोकड उपलब्ध करुन देण्यात आल्याचे बँकांनी स्पष्ट केलं आहे. नोटाबंदीनंतर केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहारावर सर्वाधिक भर दिला असला, तरी रोखीने व्यवहार करण्याचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. त्यामुळे एटीएमवर भार पडत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बँकांकडून सातत्याने ऑनलाईन अथवा डिजिटल माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे.