नवी दिल्ली : रेल्वे स्थानकांवर लवकरच 'शुभमंगल सावधान'चा आवाज घुमण्याची शक्यता आहे. कमी गर्दीची रेल्वे स्थानकं लग्नकार्यासाठी भाड्याने देण्याचा विचार आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कल्पना सूचवली असून, रेल्वे मंत्रालयाने या कल्पनेवर गांभिर्याने विचार सुरु केला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेच्या विकासासाठी नाविन्यपूर्म कल्पना, ज्या प्रत्यक्षात अंमलात आणणं शक्य होतील, अशा कल्पना सूचवण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर नवी दिल्लीत रेल्वे विकास शिबिरात रेल्वेतील एका अधिकाऱ्याने कल्पन सूचवली की, कमी गर्दीचे प्लॅटफॉर्म लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने द्यावे.

रेल्वे अधिकाऱ्याने रेल्वे विकास शिबिरात सूचवलेली कल्पना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या समोर मांडण्यात आली आहे. त्यावर रेल्वेकडून गांभिर्याने विचारही सुरु आहे. जर याबाबत निर्णय घेण्यात आला, तर लवकरच रेल्वे प्लॅटफॉर्मवर 'शुभमंगल सावधान'चा आवाज घुमेल. शिवाय, इतर कार्यक्रमाही होताना दिसतील.

अनेक रेल्वे स्थानकांवर अशी प्लॅटफॉर्म असतात, जिथे फार गाड़्या थांबत नाहीत किंवा लोकांची गर्दीही कमी असते. अशा कमी गर्दीचे प्लॅटफॉर्म लग्नासारख्या कार्यक्रमांना भाड्याने देण्याची कल्पना रेल्वेला आर्थिक हातभार लावण्यासही महत्त्वाची ठरेल. लग्नकार्यासोबतच इतर कार्यक्रमांसाठीही या पद्धतीचा वापर केला जाण्याची शक्यता आहे.