मुंबई : शुद्ध भगवा कोणाचा हे जनताच ठरवेल, असं उत्तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला दिलं. तसंच मुंबईला दिल्लीची पायपुसणी करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. एबीपी माझाशी संजय राऊत यांनी एक्स्लुझिव्ह संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचा सर्वात मोठा गड अर्थात मुंबई महापालिकेसाठी भाजपने 'मिशन मुंबई' सुरु केलं आहे. याबाबत भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवण्याचा निर्धार विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


मुंबई महापालिकेची निवडणूक 2022 मध्ये होणार आहे. परंतु भाजप आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. याबाबत बुधवारी (18 नोव्हेंबर) भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात मुंबई भाजप कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेवर निशाणा साधला. सोबतच मुंबई महापालिकेवर शुद्ध भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला.


'शुद्ध भगवा कोणाचा हे जनता ठरवेल'
याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते आहेत, त्यामुळे त्यांनी अशी भूमिका घेणं त्यांच्या पक्षासाठी योग्य आहे. मुंबई महापालिकेवर सध्या फडकणारा भगवा शुद्ध नाही आणि ते घेऊन येणारा भगवा शुद्ध आहे, असं भाजपला वाटत असेल तर त्याचा निर्णय जनता घेईल. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं आहे. मुंबईवर आलेल्या संकटाच्या वेळी मुंबईतील मराठी माणूस रस्त्यावर उतरला आहे. रक्त सांडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आहेत. ज्यांना मुंबईवर शुद्ध भगवा फडकवायचा आहे त्यांनी हा इतिहास चाळावा. आमच्यासाठी एकच भगवा आहे जो शिवरायांचा आहे.


"मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा घाट सुरु आहे. भाजपची सत्ता आल्यास हे नक्कीच होईल," असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, "गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या मुंबईतील उद्योजकांना आपल्या राज्यात बोलावतात. याविरोधात भाजपचा एकही नेता बोलत नाही, पण शिवसेनेचे नेते बोलतता."


मुंबई महापालिकेवर 2022 मध्ये भगवाच फडकेल, पण भाजपचा; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार


कंगना रनौत, अर्णब गोस्वामींवर नाव न घेता टीका
संजय राऊत यांनी यावेळी नाव न घेता अभिनेत्री कंगना रनौत आणि रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वारी यांच्यावरही टीका केली. राऊत म्हणाले की, "बीएमसीने ज्या नटीचं कार्यालय तोडलं ती भाजपची कार्यकर्तीच आहे. ती मुंबई पोलिसांना माफिया म्हणते. मुंबईला पाकिस्तान बोलते. मुंबईकर तिच्याविरोधात उसळून उठले, पण तिच्या समर्थनार्थ कोण आले तर ज्यांच्याकडे शुद्ध भगवा आहे ते."


तर अर्णब गोस्वामी यांच्या माध्यमातून राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला. "अन्वय नाईक या मराठी माणसाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अँकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. आम्ही अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी उभे आहोत. पण हे लोक त्या अमराठी अँकरच्या पाठिशी उभे राहून रस्त्यावर येत आहेत. हे तुमचं मराठीपण, हा भगवा?" असं संजय राऊत म्हणाले.


भेसळयुक्त भगवा कधीच मुंबई महापालिकेवर फडकणार नाही
छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांची या भगव्यासंदर्भातील भूमिका अतिशय तीव्र होती. जर भेसळयुक्त भगवा असेल तर मुंबई महापालिकेवर कधीच फडकणार नाही. आज जो भगवा फडकतोय तो कधी उतरलाच नाही. तुम्ही आज भगवा उतरवण्याच्या कामाला लागला आहात, म्हणजेच तुम्हाला एकप्रकारे ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवायचा आहे.


कांजूरमार्ग मेट्रो कारशेडवरुन फडणवीसांच्या टीकेवर राऊत काय म्हणाले?
कांजूरमार्ग इथल्या मेट्र कारशेडवरुन देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली. "इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजूरमार्ग' अशा शब्दात फडणवीसांनी सरकारवर निशाणा साधला. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, "मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याची गोष्ट ही सरकार आल्यावर झालेली नाही. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हापासूनची ही भूमिका आहे. जंगल वाचवण्यासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका सोडलेली नाही."


'ट्विटरवर श्रद्धेचं मोजमाप करता येत नाही'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर रोजी आठवा स्मृतीदिन होता. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी ट्वीट करुन त्यांना आदरांजली वाहिली नाही, यावरही फडवणीस यांनी भाष्य केलं होतं. यावर बाळासाहेबांविषयी सगळ्यांच्या मनात श्रद्धा आहे, असं राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "जवाहरलाल नेहरु यांच्याबाबत राजकीय मतभेद असू शकतील पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांच्याविषयी आदर आहे. देशाच्या जडणघडणीत पंतप्रधान म्हणून नेहरुंची भूमिका महत्त्वाची आहे. बाळासाहेब ठाकरेंबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या मनात श्रद्धा आहे, त्या तशाच राहणार. ट्विटरवर श्रद्धेचं मोजमाप करता येत नाही. अलिकडे देशाच्या राजकारणात ट्विटरसेना निर्माण झाली आहे."


'बीएमसीवरील भगव्याला हात लावण्याचीही त्यांच्यात हिंमत नाही'
"भाजपचं मिशन, कमिशन जे काही असेल ते सुरु आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांना बीएमसीत इंटरेस्ट आहे कारण त्यांना मुंबईत इंटरेस्ट आहे, मुंबईतील उद्योगांमध्ये इंटरेस्ट आहे, आर्थिक उलाढालीत इंटरेस्ट आहे. त्यांना मुंबईला दिल्लीची पायपुसणी करायची आहे आणि आम्ही ते होऊ देत नाही, याचं त्यांना दु:ख आहे. त्यांना मुंबई विकायची आहे, मुंबई घशात घालायची आहे. आमचं म्हणणं आहे की, मुंबई श्रमिकांची आहे, मराठी माणसांची आहे. त्यांना मुंबई ओरबडायची आहे. 100 पिढ्या जरी खाली उतरल्या तरी मुंबई महापालिकेवरचा भगवा उतरवण्याची सोडा, त्याला हात लावण्याचीही तुमची हिंमत नाही. हात जळून खाक होतील. कारण त्यामध्ये लाखो, कोट्यवधी लोकांचं रक्त त्याग आहे," असं संजय राऊत यांनी नमूद केलं.