पुलवामात दहशतवादी हल्ला, साताऱ्याच्या सुपुत्रासह 8 जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम | 26 Aug 2017 10:57 AM (IST)
पुलवामामध्ये पोलीस क्वॉर्टरला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला चढवला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 8 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर जवानांनी दोन दहशतवाद्यांचाही खात्मा केला.
श्रीनगर : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघाती हल्ल्याच्या उद्देशाने आज पहाटे 4.30 वाजता दहशतवादी घुसले. पुलवामाच्या पोलीस लाईनमध्ये हे दहशतवादी घुसले असून त्यांनी केलेल्या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहे. थेट पोलिसांच्या क्वॉर्टरलाच लक्ष्य केल्यानं हा मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 3 पोलीस आणि 5 सीआरपीएफ जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांमध्ये साताऱ्याचे रवींद्र धनवडे यांचाही समावेश आहे. दहशतवादी सध्या या रहिवाशी इमारतींपैकी एका इमारतीमध्ये लपले असून त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असल्याची प्राथमिक माहिती आहे. अजूनही तीन दहशतवादी या इमारतींमध्ये लपले आहेत. दरम्यान दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस क्वॉर्टर रिकामी करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. या परिसरात जवळपास 10 इमारती आहेत, त्यापैकी दोन ब्लॉक खाली करण्यात आले आहेत. या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या सर्व 32 कुटुंबांना वाचवण्यात यश आलं आहे. या परिसरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.