अहमदनगर : अयोध्येत राम मंदिरच होणारच आणि तेही दोन्ही समाजाच्या सहमतीने बनेल, असा दावा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केला आहे. अहमदनगरला ते ज्ञानमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त साधकांशी संवाद साधताना बोलत होते.


आतापर्यंत हातात घेतलेल्या कामाला यश आलं आहे. त्यामुळे या कामालाही यश येईल, असा विश्वास त्यांनी केली आहे. त्याचबरोबर, इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज कबूल होत नसल्याचंही त्यांनी म्हटलं.

यावेळी बोलताना श्री श्री रविशंकर यांनी राम मंदिराच्या चर्चांचा तपशील देत, मंदिर होणारच असल्याचं सांगितलं.

“निर्मोही अखाड्याचे 90 वर्षीय वयोवृद्ध रामचंद्र बंगळुरुला भेटले. यावेळी त्यांनी मध्यस्थी करण्याची गळ घालून या जन्मी अयोध्येत राम मंदिर पाहायची इच्छा व्यक्त केली. मात्र या विषयात मोठ्या प्रमाणात राजकारण आहे.”, असेही ते म्हणाले. तसेच, या प्रकरणी 2002 साली मी दोन्ही समाजाला एकत्र करुन समझोता करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी अपयश आलं. त्यानंतर शंकराचार्य सरस्वती यांनीही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही अपयश आल्याचं रविशंकर यांनी सांगितलं.

आतापर्यंत 500 इमामांसोबत चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी राम लल्ला सध्याच्या जागेवरुन हटवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर राम लल्लाची मूर्ती हटणार नसल्याचं सर्वांना माहित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर, इस्लाम धर्मात वादग्रस्त जागेवर नमाज कबूल होत नाही. 60 एकरातील एक एकरात मशीद झाल्यास, पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाच एकरात वेगळ्या ठिकाणी मशीद बांधावी आणि एक एकर जागा रामजन्मभूमीसाठी देण्याचा प्रस्ताव मौलानांनी मानला असल्याचं सांगितलं.

या संदर्भात सुन्नी वक्फ बोर्डासह सर्व पक्षकार भेटले आहेत. मात्र काही लोकांना हे पटलं नाही. त्यांना वादच हवा असल्याचा आरोप रविशंकर यांनी केला.

कोर्ट का फैसला दिलों को जोड नही सकता, असा दावा त्यांनी केला.