नवी दिल्ली : ट्विटरवर सक्रीय असणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पुन्हा एकदा चर्चेत आहेत. एका तरुणाने ट्विटरवर सुषमा स्वराज यांना टॅग करुन लिहिलं होतं की, "बालीला जाणं सुरक्षित आहे का?" यावर सुषमा स्वराज यांनी मजेशीर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या की, "यासाठी मला ज्वालामुखीशी बोलावं लागेल."


सुषमा स्वराज यांच्या या ट्वीटवर लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुषमा स्वराज यांच्या या उत्तराला आतापर्यंत 14 हजारांपेक्षा जास्त लाईक मिळाले आहेत. तर अडीच हजारांपेक्षा जास्त जणांनी ते रिट्वीट केलं आहे.

सुशील कुमार राय नावाच्या युझरने ट्वीट करुन विचारलं होतं की, "बालीचा प्रवास करणं सुरक्षित आहे का? 11 ऑगस्टपासून 17 ऑगस्टपर्यंत आमची बालीची ट्रिप आहे. तिथे जाणं सुरक्षित आहे. आपल्या सरकारने कोणती अॅडव्हायजरी जारी केली आहे का? कृपया लवकर सांगा."


या प्रश्नावर उत्तर देताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, "यासाठी मला तिथल्या ज्वालामुखीशी बोलावं लागेल." या उत्तरावर काहींनी सुषमा स्वराज यांच्यावर नाराजी व्यक्त केली तर काहींनी त्या व्यक्ती मज्जा घेतली.