मुंबई : गेल्या काही दिवसांपासून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना तन्वी सेठ पासपोर्ट प्रकरणावरुन ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. यामुळे उद्विग्न झालेल्या सुषमा स्वराज यांनी आज ट्विटर एक पोल घेत युजर्सनाच प्रश्न विचारला आहे.


या पोलमध्ये त्यांनी विचारलं की, मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून जे काही होत आहे, ते तुम्हाला मान्य आहे कासुषमा स्वराज यांनी या प्रश्नाखाली ‘होय’ आणि ‘नाही’ असे पर्याय दिले आहेत. शिवाय पोलचं ट्विट रिट्वीट करण्याचेही आवाहन केले आहे.


धक्कादायक म्हणजे, येथेही ट्रोल्सची संख्या जास्त दिसत आहे. कारण इथेही ‘होय’ या पर्यायवर अनेकांनी क्लिक केलेले दिसत आहे. तब्बल 43 टक्के लोकांनी या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देत ट्रोलिंगची पाठराखण केली आहे, तर उर्वरीत 57 टक्के लोकांच्या मते सुषमा स्वराज यांच्या बाबतीत जे झालं, ते चुकीचं होतं.

या पोलनंतर स्वराज यांनी आणखी एक ट्वीट करत म्हटलंय की, ‘लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण अभद्र भाषा न  वापरता.’


तसेच, ट्रोलिंगमुळे दु:खी झालेल्या सुषमा स्वराज यांनी नीरज यांची एक कविता वापरत आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.


स्वराज यांचं ट्रोलिंग कशामुळे?

तन्वी सेठ या उत्तरप्रदेशातील विवाहित महिलेला पासपोर्ट नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या आदेशानंर निलंबित करण्यात आलं. तसंच तन्वी यांना पासपोर्ट दिला गेला. या प्रकरणाला हिंदू-मुस्लीम वादाचीही किनार देण्यात आली होती. कारण तन्वी यांनी आरोप केला होता की, पासपोर्ट अधिकाऱ्याकडून तिच्या पतीला धर्मांतर करण्यास सांगितलं गेलं.वास्तविक तन्वी सेठ यांनी खोटी माहिती दिल्यामुळे त्यांचा पासपोर्ट नाकारण्यात आला होता. पासपोर्ट अधिकाऱ्यावर कारवाई केल्यामुळे संतापलेल्या ट्रोलर्सने सुषमा स्वराज यांच्यावर ट्विटरवरुन अश्लाघ्य भाषेत टीका केली होती.