नवी दिल्ली : भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींच्या संघावरच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपनं देशाला 4 महिला मुख्यमंत्री, 4 महिला राज्यपाल आणि 6 केंद्रीय मंत्री दिल्यात अशा अशा शब्दात सुषमा स्वराज यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अहमदाबादमध्ये महिलांसाठी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.


भाजप आणि संघात महिलांना समान वागणूक मिळत नसल्याची टीका राहुल गांधींनी केली होती. त्याला उत्तर देताना सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला.

सुषमा स्वराज म्हणाल्या की, राहुल गांधी हे काँग्रेचे वरिष्ठ नेते तसेच पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. सध्या ते पक्षाची सूत्रं लवकरच आपल्या हाती घेतील, अशी चर्चा सुरु आहे.त्यामुळे अशा व्यक्तीला ही भाषा शोभत नाही.

राहुल गांधींच्या टीकेवर बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, राहुल गांधी विचारतात की, रा.स्व.संघात महिलांना प्रवेश का नाही? त्यावर मी निश्चितच त्यांना योग्य ते उत्तर दिलं असतं. पण त्यांनी ज्या असभ्य पणे हा प्रश्न विचारला, त्यामुळे त्याचं उत्तर देणं योग्य नाही.

काही दिवसांपूर्वीच राहुल गांधींनी भाजप आणि रा.स्व.संघावर जोरदार टीका केली होती. संघाच्या शाखेत एखाद्या महिलेला शॉर्ट्स घालून जाताना, तुम्ही कधी पाहिलंय का? असा सवाल राहुल गांधींनी केला होता. तसेच जोपर्यंत महिला शांत आहे, काही बोलत नाही, तोपर्यंत ठीक, पण महिलेने तोंड उघडलं तर तिला गप्प बसवा, असे ह्यांचे (भाजप) विचार आहेत. ह्यांची मुख्य संघटना आरएसएस आहे. किती महिला त्यात आहेत? शाखेतल्या महिलांना कधी शॉर्ट्समध्ये पाहिलंय? मी तरी पाहिलं नाही!”

राहुल गांधींच्या या वक्तव्यावर त्यांच्यावर चोहूबांजूंनी टीका होत होती. राहुल गांधींनी वापरलेली भाषा अयोग्य आहे. त्यांनी पातळी न सोडता टीका केली असती, तर मी त्यांना जरुर उत्तर दिले असतं असं आज सुषमा स्वराज यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

संघाच्या शाखेतल्या महिलांना कधी शॉर्ट्समध्ये पाहिलंय? : राहुल गांधी