नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसनं माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. पण मोदी सरकारच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर 2013 मधील एक व्हिडीओ शेअर करुन, मीरा कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. विशेष म्हणजे, मीरा कुमार यांच्यावर टीका करताना त्यांनी लोकसभा अध्यक्षा असताना महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेत 6 मिनिटात 60 वेळा हटकलं, असल्याचंही म्हटलं आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं भाजपविरोधी पक्षांची मोट बांधून मीरा कुमार यांना उमेदवारी दिली. पण मीरा कुमार यांच्या उमेदवारीवरुन सुषमा स्वराज यांनी ट्वीट करुन त्यांच्यावर टीका केली आहे. लोकसभेमध्ये 30 एप्रिल 2013 रोजी यूपीएच्या घोटाळ्यासंदर्भात चर्चा सुरु होती. यावेळी सुषमा स्वराज यांनी तत्कालिन यूपीए सरकारवर जोरदार हल्ला चढवला. या चर्चेचा दोन मिनिटाचा व्हिडीओ ट्वीट करुन स्वराज यांनी मीरा कुमार यांनी आपल्याला 6 मिनिटात 60 वेळा हटकलं, असल्याचा आक्षेप नोंदवला आहे. दरम्यान, या व्हिडीओवर काँग्रेसनं स्वराज यांनाच लक्ष्य केलं आहे. काँग्रेस नेते टॉम वडक्कन म्हणलं आहे की, ''सुषमा स्वराज यांनी ट्वीटरवरुन मीरा कुमार यांच्यावर जो आक्षेप नोंदवला आहे, त्यात तथ्य नाही. लोकसभेच्या नियमांनुसार, त्यांना त्याचं म्हणणं मांडण्यास योग्य तो वेळ दिला गेला होता. वेळ संपल्यानंतर संबंधित व्यक्तीला थांबवणं हे प्रत्येक लोकसभा अध्यक्षाचं कर्तव्य असंत. आणि मीरा कुमार यांनी ते पाळलं आहे.'' तर दुसरीकडे काँग्रेस नेते एन.ए. हैरिस यांनी सुषमा स्वराज महत्त्वाच्या पदावर असल्याने, त्यांनी अशा प्रकारची कृती करणं पदाला शोभत नसल्याचं म्हणलं आहे. यूपीए सरकारच्या 2009 ते 2014 या कार्यकाळात मीरा कुमार या लोकसभा अध्यक्षा होत्या. त्यांना काँग्रेसनं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दिली असून, काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाजवादी पार्टी, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीएम, सीपीआयसह इतर पक्षांनी मीरा कुमारी यांच्या उमेदवारीला समर्थन दिलं आहे.