नवी दिल्ली : मनाविरुद्ध लग्न लावल्याच्या नाराजीतून घर सोडून पळालेल्या तरुणीला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला. सासर आणि माहेरशी संबंध तोडून तरुणीने स्वतःच्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगावं, असं सर्वोच्च न्यायालयाने तिला सुचवलं.


संबंधित 26 वर्षीय तरुणी कर्नाटकातील एका मंत्र्याची कन्या आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या नोंदीत तिचा उल्लेख 'क्ष' असा करण्यात आला आहे.

प्रियकराशी लग्न करण्याची इच्छा असतानाही पालकांनी दुसऱ्याच तरुणासोबत तिची सोयरीक जुळवली. चिडून तिने गुलबर्गातील राहतं घर सोडलं आणि दिल्ली गाठली. सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर तिला दिल्ली पोलिस आणि महिला आयोगाकडून संरक्षण पुरवण्यात आलं.

बंगळुरुत जाऊन आपल्या इंजिनिअरिंगमध्ये मास्टर्सची पदवी मिळवण्याची इच्छा तरुणीने व्यक्त केली. 'तू सज्ञान आहेस. तुला हवं तिथे तू जाऊ शकतेस, आणि इच्छा असेल ते शिक्षण घेऊ शकतेस' असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने तिला सांगितलं.

पती आणि पालकांकडून तरुणीच्या जीवाला धोका असल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं. 'आईच्या पाठिंब्याने तरुणीच्या भावाने तिला बलात्कार करण्याची धमकी दिली आहे' असं सांगत वकिलांनी संभाव्य धोक्यापासून तिला संरक्षण देण्याची मागणी केली.

'सज्ञान व्यक्तींना इच्छा असेल तिथे जाण्याचं स्वातंत्र्य आहे. एखाद्या तरुणीच्या आयुष्यात तिचे पालक, कुटुंबीय, पती किंवा त्याचं कुटुंबीय अडथळा आणू शकत नाहीत' असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.